धाराशिव (जयनारायण दरक यांजकडून ) – दि.६ पत्रकारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या शासन दरबारी मांडून मान्य कराव्यात अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाने भेटून एका निवेदनाद्वारे दि.६ डिसेंबर रोजी केली. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासारखे राज्यातील पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करून त्यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी,राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेडिओ,टीव्ही व डिजिटल मीडियात काम करणाऱ्यांना श्रमिक पत्रकारांच्या वर्गवारीत समाविष्ट करण्याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात यावे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, तर प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालय,तंत्रनिकेतन व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाने कोटा ठरवून परिपत्रक काढावे.तसेच केंद्राच्या माहिती व प्रसारण खात्याच्या माध्यमातून २०२१ मध्ये तयार करण्यात आलेल्या डिजिटल मीडिया इथिक्स कायद्याच्या अंतर्गत व नियमन संस्थांच्या माध्यमातून होणारी अंमलबजावणी व्हावी. तर डिजिटल मीडियाच्या तक्रारी सरळ पोलीस ठाण्यात न जाता किंवा डिजिटल पोर्टलला सरळ कायदेशीर नोटीस न पाठविता डिजिटल पोर्टल कंपनी अथवा प्रकाशक किंवा तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवावेत. तसेच सर्व डिजिटल मीडिया पोर्टलची नोंदणी कायदेशीररित्या व्हावी, त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात यावेत. त्याबरोबरच कायद्यामध्ये सुलभता येण्याच्या दृष्टीने राज्य आणि जिल्हास्तरावर नोंदणीसाठी बदल करण्यात यावेत,तर डिजिटल मीडिया नोंदणी करताना अनामत रक्कम स्विकारण्यात याव,तसेच देशभरातील दैनिके,साप्ताहिक, मासिक,पाक्षिक व अन्य नियतकालिकांचे अंक प्रकाशित झाल्यानंतर ४८ तासांच्या आत आर.एन.आय व पीबीआय कार्यालयात पाठविणे बंधनकारक करण्यासह सध्याच्या नियमात अन्य विविध बदल करण्यासाठी सादर झालेले जनविश्वास बिल व त्यातील घातक बारकावे मध्यम व लहान आकाराच्या वृत्तपत्र संस्थांना अकारण अडचणीत आणणारे आहेत. त्यामुळे ते जनविश्वास बिल तातडीने मागे घेण्यात यावे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आ. किशोर पाटील यांच्याकडून झालेली शिवीगाळ, त्यांचे समर्थन त्यानंतर समर्थक गुंडाकडून झालेल्या मारहाणी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होऊन गुन्हेगारांवर पत्रकार हल्ला कायद्याने गुन्हा दाखल होणे व या प्रकरणी गुन्हेगारांना पाठीशी घालणे आदी कर्तव्यात कसूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना योग्य ते शासन करण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात यावा. विशेष म्हणजे पत्रकारांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन १० वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबाला मागेल त्या रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळावेत. तसेच पत्रकारांचे पगार, मानधन व स्वातंत्र्य विषयी निश्चित धोरण नाही. त्यामुळे पत्रकारांचा पगार, मानधन आणि स्वातंत्र्य विषयी धोरण ठरवून तसे परिपत्रक काढण्यात यावे. तर निवाऱ्या विना असलेल्या पत्रकारांना निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महसुली जागेची निवड करून पत्रकार गृहनिर्माण वसाहत निर्माण करून त्या ठिकाणी शासकीय योजनेमधून किमान १०० घरे निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात यावा. तसेच पत्रकारांना शासकीय सवलतींचा लाभ मिळावा यासाठी १० वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना शासनाने अधिस्वीकृती कार्ड द्यावे, ३ वर्षे पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला बार कौन्सिल ज्याप्रमाणे वकिलीची सनद देते, त्या धर्तीवर शासनाने प्रमाणपत्र देऊन नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. तसेच शासनाद्वारे जाहिरात देत असताना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या स्तरावर रोटेशन पद्धत अंमलात आणून प्रकाशित होत असलेले दैनिक, साप्ताहिक मासिक व पाक्षिक यांची यादी तयार करून सर्वांना समान न्याय आणि समान रक्कम मिळेल असे धोरण ठरविण्यात यावे, त्याबरोबरच वयोवृद्ध पत्रकारांना कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविण्यासाठी दरमहा २० हजार रुपये मानधन मंजूर करून पत्रकारितेशिवाय वेगळ्या क्षेत्रात विशेष कार्य करून शासनाला सहकार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रतिवर्षी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सत्कार करणारी पत्रकार सन्मान योजना लागू करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, अरुण गंगावणे, आसिफ मुलाणी, किरण कांबळे, मुस्तफा पठाण, प्रशांत मते, आकाश नरोटे, वैभव पारवे, कुंदन शिंदे, सलीम पठाण, शाहिद शेख, किशोर माळी, शितल वाघमारे, अल्ताफ शेख, प्रशांत सोनटक्के, रेडिओ विंगचे जिल्हाध्यक्ष रमेश पेठे, जफर शेख, सचिन वाघमारे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
More Stories
बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात,आमदारानी दिला शेतकऱ्यांना आधार
दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पृथ्वीराज चिलवंत यांचा वाढदिवस साजरा