कळंब – कळंब तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षापासून नवीन शिधापत्रिका तहसील कार्यालया मार्फत दिलेल्या आहेत,परंतु सदरील शिधापत्रिकाधारकांना अद्यापही धान्य उपलब्ध झाले नसल्यामुळे अशा लाभधारकांची शोध मोहीम राबवून त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करुन त्यांची होणारी गैरसोय व उपासमार थांबवावी अशी मागणी मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने कळंब तहसीलचे तहसिलदार हेमंत ढोकले यांना निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कळंब तालुक्यामध्ये अनेक शिधापत्रिकेमध्ये मयत नागरिकांचा समावेश असून त्यांची नावे अध्यापही वगळण्यात आलेली नसल्यामुळे त्यांचे शिल्लक राहत असलेले धान्य नवीन शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावे. तसेच अंत्योदय अन्नसुरक्षा योजनेमधील लाभार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून साखर बंद असल्यामुळे लाभधारकांना साखरेचे वाटप करण्यात यावे. तसेच तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार हे लाभधारकांना धान्य उचलल्यास पावती देत नाहीत अशी चर्चा तालुक्यांमध्ये चालु असल्यामुळे सदरील दुकानदार हे पावती देतात का नाही? याची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व घरांची पडझड झालेल्या नागरिकांना तात्काळ शासनाकडून मदत देण्यात यावी. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सदरील निवेदनावर मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, सचिव दत्तात्रय मोरे,सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल वाघमारे,बाबासाहेब टोपे, बाळासाहेब सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड