धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा नळदुर्ग किल्ला हा राज्यातील एक अनमोल ठेवा आहे.या किल्ल्याच्या सौंदर्यवर्धनासह पर्यटन वाढीच्या दृष्टीने भव्य विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. पालकमंत्री सरनाईक यांनी आज २० जुलै रोजी नळदुर्ग किल्ल्याची सविस्तर पाहणी केली.यावेळी त्यांनी किल्ल्याच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्याच्या जतन व संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.पर्यटनाला चालना मिळावी,स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात व इतिहासाची जपणूक व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार्याने विशेष योजना आखली जाणार आहे.असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले. किल्ल्यातील दुर्गम भागात रस्ता सुधारणा,माहिती फलक,स्वच्छता व्यवस्था,प्रकाशयोजना,सुरक्षा यंत्रणा तसेच पर्यटकांसाठी सुविधा केंद्रे उभारण्यावर भर दिला जाणार आहे.यामुळे देश-विदेशातील पर्यटक नळदुर्गला भेट देण्यासाठी आकर्षित होतील,असा विश्वास पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,तुळजापुर तहसीलदार अरविंद बोळंगे,पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी नागरिकांनीही या ऐतिहासिक ठेव्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन केले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान