बारामती (ग.दि.मा. सभागृहातून ) – देशातील माध्यमांची स्थिती बदलली आहे.पत्रकारांना स्वतःचे मत मांडायला आणि भूमिका घ्यायला वाव कमी असल्याचे वातावरण आहे. पत्रकारांनी सत्य आणि योग्य असेल, तरच मांडावे. पण कुणाच्या सूचनेवरून भूमिका ठरवू नका, असा सल्ला देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी बारामती येथे व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना पत्रकारांना दिला. सामान्यांच्या अपेक्षांचे ओझे पत्रकारितेवर असल्याने सामान्यांचा हा जो व्हॉईस आहे, तो दुबळा होऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले. पत्रकारिता व साहित्याच्या माध्यमातून आयुष्य झिजविणाऱ्या सारस्वतांचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देवून ते बोलत होते.यासोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सेवा देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या भाषणात पवार पुढे म्हणाले,पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थित राहिलो आहे. महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते. स्व.नीळकंठ खाडीलकर यांनी अनेकवेळा मुलाखती घेतल्या. राजनीती हे पहिले वर्तमानपत्र काढले. नेता, काँग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही काम केल्याच्या गमतीदार आठवणी त्यांनी सांगितल्या. मोदींच्या नेतृत्वातील भाजपशासित राज्ये कमी आहेत.खास करून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रमध्ये भाजप नाही. गोव्यात तोडफोड झाली. महाराष्ट्रात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. देशातील जवळपास ५ टक्के राज्ये भाजपच्या बाजूला नाहीत. येत्या काळात देशापुढील स्थिती बदलेल असे चित्र आहे. त्यासाठी प्रामाणिक पत्रकारितेची आज खरी गरज आहे, असे सांगून ज्येष्ठ नेते पवार शेवटी म्हणाले, सत्य मांडा, असत्यावर बोट ठेवा. मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून काही मांडू नका. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना देशापुढील सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान पत्रकारांसमोर असल्याचे सांगितले. व्हॉईस ऑफ मीडियाने छोट्या पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे सुरू केलेले काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. गेल्या तीन-चार वर्षांत देशाची सामाजिक परिस्थिती बिघडत चालली असून, त्यात सुधार करण्याचे काम सरकारने केले पाहिजे. पत्रकारांची भूमिका त्यात मोठी राहणार आहे, असेही शिंदे म्हणाले. देशात आज सामाजिक सुरुंग लावले जात असून, जाती-पातींमध्ये जाणिवपूर्वक संघर्ष पेटविले जात आहेत. काश्मीरमध्ये पत्रकारितेवर बंधने आहेत. जागतिक पातळीवरच पत्रकारिता बिकट होत चालली आहे. आशियाई देशांमध्येही अशीच परिस्थिती आहे. पत्रकारितेला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ संपादक खा.कुमार केतकर यांनी यावेळी केले. व्हॉईस ऑफ मीडियाचा पुढचा सेमिनार ईशान्य भारतात घ्या. तो भाग अडचणीत आहे, असे ते म्हणाले. मणिपूरमध्ये चार पत्रकार ठार मारले गेले आहेत. भारतीय सैन्य आसाम रायफलला देखील टार्गेट केले जात आहे. २०२४ मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे.विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत. नंतरचा पिक्चर मोठा राहणार आहे, अशी टिप्पणी करून खा. केतकर यांनी पत्रकारांना वास्तविक चित्रण करणे कठीण होवून बसले असल्याची खंत व्यक्त केली.
More Stories
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
घर घर माहितीचा अधिकार कायदा पोहचवा – अब्राहम आढाव
ऑल इंडिया संपादक संघ बारामती नूतन कार्यकारणी घोषित