कळंब (अविनाश घोडके) – कळंब नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा नागरिकांना दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.अशुद्ध आणि आरोग्यास हानीकारक पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांना आमंत्रण मिळत असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा नगर परिषदे मार्फत होत होता,परंतु दि.१७ मार्च २०२५ रोजी शहरातील बाबा नगर मधील नागरिकांना नळांमधून येणारे पाणी गढूळ,पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त आले आहे.यासंबंधी नागरिकांनी हा प्रश्न वारंवार उपस्थित केला असला तरी, प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे डायरिया,कॉलरा, त्वचारोग,तसेच इतर जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे. नागरिकांनी प्रशासनाला वारंवार आठवण करून दिली की, स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करणे हा त्यांचा कर्तव्य आहे.मात्र,अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडले असून,स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंतेत असून,वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना याचा अधिक फटका बसत आहे.यामुळे संतप्त नागरिकांनी नगर परिषदेच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे.
** प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात – या समस्येवर त्वरित उपाय करण्याची आवश्यकता आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्प व्यवस्थित कार्यरत आहेत का, टाक्यांची आणि पाईपलाइन्सची नियमित स्वच्छता होते का, याची तपासणी प्रशासनाने करावी. नागरिकांनीही उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिण्यावर भर द्यावा आणि आरोग्यासंबंधी कोणतीही समस्या जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नगर परिषदेला वेळेवर योग्य निर्णय घेऊन नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास बांधील राहिले पाहिजे.अन्यथा, लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र जनआंदोलन उभे राहण्याची नागरिकांत चर्चा ऐकावयास मिळत असून कळंब वासियांसाठी न.प.ने गॅस्ट्रोला आमंत्रण दिले आहे.असेही बोलले जाते.
More Stories
शहरात श्री क्षेत्र गजानन महाराज पालखीचे आगमन व जल्लोषात स्वागत
मोहेकर महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक डे साजरा
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा