June 22, 2025

नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात

  • कळंब (अविनाश घोडके)- शहरातील आठवडी बाजार रोड सध्या दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.रस्त्यावर मोठमोठे खड्डे आणि सांडपाण्याची समस्या गंभीर बनली असून,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक अपघात होत आहेत.विशेषतःटू-व्हीलरस्वारांना या समस्येचा मोठा फटका बसत असून,काहींनी ह्या रस्त्यावरून जात असताना गाडी स्लिप होऊन रस्त्यावर पडलेले आहेत.
    आठवडी बाजार रोड हा शहरातील महत्त्वाचा मार्ग आहे, मात्र रस्त्यावर सर्वत्र खड्डे आणि सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डे ओळखणे कठीण होते आणि अचानक तोल जाऊन अपघात होतात.यामुळे अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
    स्थानिक रहिवाशांनी आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेने या समस्येकडे कानाडोळा केला आहे.सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे,तसेच दुचाकीस्वारांसाठी हे अधिकच धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने वेळेवर योग्य उपाययोजना केल्या नाहीत,तर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,असा इशारा ह्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यापारी अभिजित हौसलमल, मेकॅनिकल संतोष लिमकर, टेलर्स सुरज शिंगणारे,माळी लॅब प्रोप्रायटर अरुण माळी,यशपाल गायकवाड,रोशन वाघमोडे, जगदीश जाधव यांनी दिला आहे.
  • नागरिकांच्या मागण्या –
    तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी – खड्डे बुजवून रस्ता योग्य स्थितीत आणावा,सांडपाण्याचा निचरा करावा – ड्रेनेज सिस्टम सुधारून रस्त्यावर सांडपाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी,वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी – रात्रीच्या वेळी रस्त्यावर लाइटिंग आणि दिशादर्शक फलक लावावेत.
  • प्रशासनाला जाग येणार का?
  • दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.अन्यथा,लोकांचा आक्रोश वाढत जाईल आणि गंभीर परिणाम भोगावे लागतील. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत,अन्यथा त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनेल.
    कळंब नगर परिषदेला या समस्येची जाणीव होईल का? की अजूनही निष्पाप नागरिकांना आपल्या जिवाशी खेळावे लागेल? याचे उत्तर लवकरच मिळेल!
error: Content is protected !!