June 21, 2025

मराठी राजभाषा दिन

  • ” माझिया मराठीची बोलू कौतुके परि अमृता ते पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन “! मराठी भाषेला समृद्ध परंपरा निर्माण करून देणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी विनम्र अभिवादन !
    27 फेब्रुवारी हा थोर साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी कवी श्रेष्ठ श्री.कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस.हा दिवस आपण मराठी ‘राजभाषादिन’ म्हणून साजरा करतो . “माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दर्या खोऱ्यातील शिळा “! मराठी भाषेची उत्पत्ती (पूर्वपिठीका ) : – मराठी भाषेच्या उत्पत्तीचा विचार करीत असताना ‘ मराठी’ ही इंडो युरोपियन कुळाच्या वंश वृक्ष वरून तिचे स्थान स्पष्ट होते.प्राचीन काळामध्ये संस्कृत मध्ययुगीन कालखंडात प्राकृत आणि अलीकडील अर्वाचीन काळात अपभ्रंश भाषेचा समावेश होतो.आणि या अपभ्रंश भाषेचे पुढे चार प्रकार पडले.त्यामध्ये मराठी’ हिंदी, गुजराती आणि बंगाली असा एकंदर मराठीचा प्रवास आहे इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच्या काळात ‘मराठी ‘प्रचारात येऊ लागली.’मरहट्टी ‘या मूळ धातूपासून महारठ्ठी,मरहाठी , मर्हाठी असे अपभ्रंश तयार होऊन पुढे ‘मराठी’ असे मराठी या शब्दाचे स्वरूप तयार झाले.मरू पण हटणार नाही असा या शब्दाचा अर्थ आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षापासून चा समृद्ध वारसा असून गाथा सप्तशती हा संत एकनाथांचा ग्रंथ असून राजा सातवाहन यांनी संपादित केलेला आहे रामायण महाभारत या ग्रंथामध्येही शेकडो मराठी शब्द आहेत ‘बृहत्कथा ‘ हा पैशाची भाषेतील ग्रंथ असून ‘गुणाढय’ या मराठी लेखकाने दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास हा तसा सातवाहन काळापासूनचा ज्ञात आहे .’पैठण’ ही त्याची राजधानी होती ‘विनय पिटक ‘या तीस हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात लिहलेल्या बौद्धधर्मग्रंथामध्ये ‘महाराष्ट्र ‘ प्रदेशवाचक शब्दाचा उल्लेख आलेला आहे . मराठीतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे तो ब्राह्मी लिपीतील असून पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या नाणेघाटातील आहे . महाराष्ट्र श्रया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु : I असे महाकवी दंडी म्हणतात .मूलतः मराठी भाषा महाराष्ट्रीयन आहे यात तिळमात्र शंका नाही ज्ञानेश्वरी मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी ‘देशी ‘ शब्दही वापरलेला आहे ‘लिळाचरित्र ‘ ‘ विवेक सिंधू ‘ ‘ज्ञानेश्वरी’ हे ग्रंथ म्हणजेभारतीय शारदेच्या गळ्यामधील देशी कार वैभव लेणेच म्हटले पाहिजे .संत नामदेवांनी मराठी भागवत धर्माची पताका समाधी तीर्थावळीचे अभंग बाराशे 1270 म्हणजे च शके. १११२. मध्ये लिहून मराठी भाषेचा अटकेपार झेंडा रोवला हे मराठी भाषा समृद्ध झाल्यानंतर चे ग्रंथ आहेत .शिवाजी महाराजांनी मराठ्यांना बलवान करत महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना केली .आजही मराठी भाषेच्या 52 पोट बोली आहेत .मराठी भाषा ही जगामधील दहाव्या क्रमांकाची बोलीभाषा आहे 72 देशांमध्ये ती बोलली जाते .इसवी सन अठराशे अठरा मध्ये पेशवाई बुडाली आणि इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला. .इंग्रजी राजवटी बरोबर अनेक गोष्टींचा उदय महाराष्ट्रात झाला .परकीय भाषेचं इंग्रजीचं वर्चस्व मराठी भाषेवर दिसून येऊ लागलं त्यानंतर 1960 मध्ये 1 मे या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि भाषावार प्रांतरचना झाली . ” रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णातूनी फिरे सरस्वतीची पालखी” जो देश आपला इतिहास विसरतो तो देश आपली संस्कृती टिकवू शकत नाही आणि ही संस्कृती जतन करण्याचं काम आपली मातृभाषा करत असते .जो मनुष्य आपल्या मातृभाषेमध्ये समृद्ध असतो तो मनुष्य जगातील कोणत्याही भाषेमध्ये निपुण असू शकतो .आजही माणसाला क्षणार्धात आपलेपणाचे बंध निर्माण करण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत आहे. म्हणून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचा पाया समजली जाणारी मराठी आपल्या रूमारोमात जागली पाहिजे .
    माय मराठीचा ध्यास माझा माय मराठीचा अट्टाहास माझा
  • माय मराठीचे ऋण फेडण्या सज्ज असे हा श्वास माझा ‘ ( कवी कुसुमाग्रज ) ज्याप्रमाणे आईचे दूध हे जन्मलेल्या बाळाला अमृता सारखे असते ते देताना उकडून गाळून द्यायची गरज नसते पण म्हशीचे दूध हे द्यायचे असेल तर त्याची विशेष काळजी घेतली जाते कारण ते पचायला जड असते आईचं दूध बाळा ला लवकर पचतं कारण की बाळाची नाळ तिच्या पोटाशी जोडलेली असते . .मातृभाषेतून दिलेलं शिक्षण मूल लवकर शिक ते .भाषा ही संस्कृतीची वाहक असते.भाषा ही एक सामाजिक संस्था आहे .भाषा व मनुष्य प्राणी यांचा परस्पर अतूट सर्व स्पर्शी जीवनाचा अविभाज्य भाग आहे . विचार अनुभव व भावना व्यक्त करण्याचे भाषा एक प्रभावी साधन आहे .एखाद्या विशिष्ट समूहाला स्वतःची अशी एक समूह ओळख ही भाषा निर्माण करून देत असते .साहित्यिक लेखक कलावंत तसेच प्रत्येक व्यक्ती समाजामध्ये भाषा घेऊनच जन्मतो वाढतो विकसित होतो आणि शेवटही होतो पण त्याने निर्माण केलेली भाषा समाजातील बीज तत्त्वे घेऊन अवतरते.म्हणून कुसुमाग्रजांच्या वरील ओळी मला इथे महत्त्वाच्या वाटतात . मराठीची सध्य स्थिती : – आज आपण काय पाहतो साधारणतः 1990 पासून आपली मराठी भाषा ही जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये सापडली असून इंग्रजांच्या वर्चस्वाखाली दबलेली आपल्याला दिसून येते खरोखरच ही खेदजनक बाब आहे आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग एवढे जवळ आले आहे की प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त प्रगतीपथावर जाण्यासाठी इंग्रजी भाषेचे आकर्षण वाटू लागलेले आहे संगणकाच्या जाळ्यामुळे अनेक देश एकमेकांच्या जवळ आले असून जगाशी संपर्क साधायचा असेल तर आपल्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. जो तो उठतो की आपल्या मुला मुलींना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालतो म्हणूनच आज मराठी मरेल की तरेल ही भीती वाटत आहे . आणि इथेच खरे मातृभाषेकडे दुर्लक्ष होऊन मराठी -इंग्रजी भाषेच्या संघर्षाची ठिणगी पडली आहे .आज पाश्चात्य लोकांना मराठी भाषेचे महत्व पटलेलं असून त्याचा प्रचारही ते करत आहेत .अमेरिकेतील एक ख्रिश्चन म तरुण ‘नोवे त्झेक’ हेअमेरिकन विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीचे आणि इतिहासाचे धडे ही देत आहेत परंतु ;
    काही आपलेच भाषा बंधू मराठी कडे आज पाठ फिरवताना दिसत आहेत . ‘मराठी भाषा मराठी मन अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठीचा’ म्हणून मला असे वाटते की जागतिकीकरणाच्या या स्पर्धेमध्ये मराठी भाषा टिकविण्यासाठी काय केले पाहिजे ?
    १)मराठी भाषेला ज्ञान भाषेचा अभिजात दर्जा द्यायचा असेल तर ती प्राथमिक स्तरावर न राहता उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरली गेली पाहिजे . २ ) मराठी भाषेने निर्माण केलेली आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपली मुलं मराठी शाळेमध्येच घालण्याचा आग्रह धरला पाहिजे . ३ ) जागतिककीर्तीचे साहित्य थोर धर्मग्रंथ यांची आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेतून अनुवाद करून दिला पाहिजे . ४ ) महाराष्ट्रामधील सर्व प्रशासकीय व्यवहार व कार्यालयीन कामकाज यांची भाषा मराठी असली पाहिजे .शेवटी एकच म्हणावेसे वाटते प्रत्येकाने आपल्यामातृभाषेचे ऋण जाणले पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रियन भाषेची अस्मिता जोपासली पाहिजे .भारतीय संस्कृतीची पताका मराठी भाषेच्या माध्यमातून जगभर फडफडत राहो .
    हिच सदिच्छा ! सर्वांना मातृभाषा दिनाच्या
    हार्दिक शुभेच्छा !
  • लेखन – सौ.अर्चना बावीकर . कळंब.
error: Content is protected !!