June 21, 2025

दिव्यांगांप्रमाणे ‘अभया’च्या सन्मानासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विजया रहाटकर

  • लोहगाव – वंचित विकास व उदयकाळ फाउंडेशनतर्फे ‘अभया’ राज्यस्तरीय परिषद
    वंचित विकास व उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभया अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या.लोहगाव येथील नीहार आनंद निवासमध्ये आयोजित परिषदेत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा,कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर,सुनीता जोगळेकर,मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले,धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे रंजना चव्हाण आणि उदयकाळ फाउंडेशनचे बाळकृष्ण बागुल,मयूर बागुल आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकल महिलांवर काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
    विजया रहाटकर म्हणाल्या, “भारतीय कुटुंबपद्धती समाजव्यवस्थेचा आदर्श होता. मात्र,अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबपद्धतीने समाजात अस्थिरता वाढली आहे.महिला एकाकी पडत आहेत.महिला घरदार सांभाळून घेत असते. मात्र, तिच्यावर वेळ येते,तेव्हा परिस्थिती,जवळची माणसे कठोर होतात.असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो.मान,सन्मान व स्वतःच्या हक्कांसाठी झगडावे लागते. महिला सन्मान व संरक्षणासाठी कायदे आहेत.तरीही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत.समाज म्हणून आपण भान जपायला हवे.मनातून आणि डोक्यातून एकल महिला ही कल्पना काढून टाकली आणि त्यांना अभया संबोधावे,त्यांना आपल्यात सामावून घेतले,तर त्यांचे एकाकीपण दूर होण्यास निश्चित मदत होईल.”
    “अभया ही सक्षम असते, तिला आधाराची,सकारात्मक मानसिकता देण्याची गरज असते.प्रेम,स्नेह व आपलेपणा तिला या संघर्षात ऊर्जादायी ठरतात.त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची भूमिका ही ‘कॅटॅलीस्ट’सारखी आहे. समाजाचा स्वीकार आणि सकारात्मक भावना विकसित करण्यात संस्थांनी पुढाकार घ्यावा.महिला आयोग म्हणून अभयाच्या समग्र विकासासाठी काम करेल.येत्या काळात या शिफारसी केंद्र सरकारकडे देऊ. तसेच ही चळवळ देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जाण्यात महिला आयोग पुढाकार घेईल,” असा शब्द विजया रहाटकर यांनी दिला.
    प्रास्ताविकात मीना कुर्लेकर म्हणाल्या,”अभया म्हणजे न घाबरता परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊन पुढे जाणारी स्त्री. त्यांना विधवा,घटस्फोटीता, परित्यक्ता,कुमारिका असे संबोधण्यापेक्षा किंवा एकल संबोधण्यापेक्षा त्यांना अभया संबोधावे.” “नरेंद्र मोदी सरकारचे धोरण स्त्रियांना सन्मान देणारे आहे.त्यांचे सक्षमीकरण करणारे आहे.एकल महिलांच्या प्रश्नाची गंभीरता महिला आयोगाच्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी.अभयाची ही चळवळ देशपातळीवर घेऊन जाण्यात विजयाताई पुढाकार घेतील,असा विश्वास वाटतो.
error: Content is protected !!