धाराशिव (माध्यम कक्ष) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आज ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक आयोगाचे निवडणूक निरिक्षक (सामान्य) गोपाल चंद आणि पंकजकुमार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी उदयसिंह भोसले,सर्व निवडणुक निर्णय अधिकारी गणेश पवार (उमरगा),संजय डव्हळे (तुळजापूर),संजय पाटील (उस्मानाबाद), वैशाली पाटील (परंडा) यांची उपस्थिती होती.
निवडणुक निरीक्षक पंकजकुमार म्हणाले,मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी घेण्यात येणाऱ्या अभिरुप मतदानाच्या (मॉक पोल) वेळच्या मतदानाची खात्री उमेदवारांनी प्रत्यक्ष किंवा आपल्या प्रतिनिधी यांनी उपस्थित राहुन करावी.मॉक पोलच्या वेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्यास उमेदवार प्रतिनिधींनी तात्काळ लक्षात आणून द्यावे.
डॉ.ओंम्बासे म्हणाले,भारत निवडणूक आयोगाने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेवून मतदान केंद्रावर उमेदवार,उमेदवार प्रतिनिधी व मतदारांना मोबाईल घेवून जाण्यास प्रतिबंध राहणार आहे.मतदान केंद्रापासून १०० मीटर परिसरात देखील मोबाईल घेवून जाण्यास प्रतिबंध राहणार आहे.उमेदवारांचे मोबाईल ठेवण्यासाठी मतदान केंद्राबाहेर एक काऊंटर तयार करावे. तसेच उमेदवारांनी सर्व समित्यांची पूर्वपरवानगी घेवूनच निवडणूक प्रचार करावा,असेही त्यांनी सांगितले.
कोणत्या मतदान केंद्रावर कोणते ईव्हीएम मशीन जाणार आहे याची माहिती राजकीय पक्षांना देण्यात येईल.२० नोव्हेंबर रोजी मतदानाची वेळ सकाळी ७ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.मतदान सुरु करण्याच्या ९० मिनिटे अगोदर मतदान केंद्रावरील मतदान प्रतिनिधी यांचे समक्ष मतदान यंत्रे चालू करुन अभिरुप (मॉक पोल) प्रक्रिया करुनच त्यानंतर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात करण्यात येणार आहे.मतदानाच्या दिवशी मिळणारी आकडेवारी ही दर दोन तासांनी उपलब्ध होणार असल्याचे डॉ. ओंबासे यांनी सांगितले.
बैठकीत प्रास्ताविकातून माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकरी श्री.भोसले म्हणाले, जिल्हयातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण १४ लक्ष ४ हजार १२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यामध्ये ७ लक्ष ३८ हजार ६२८ पुरुष,६ लक्ष ६५ हजार ३४५ स्त्री आणि ३९ तृत्तीयपंथी मतदारांचा समावेश आहे.१८ ऑक्टोबर २०२४ रोजी मतदान केंद्र अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी संगणकीय प्रणालीव्दारे माहिती भरुन प्रथम सरमिसळीकरण करण्यात आले.
१३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी मतदानयंत्र कार्यान्वित करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगून भोसले म्हणाले,सीलबंद केलेले मतदान यंत्रे सुरक्षा कक्षामध्ये उमेदवार प्रतिनिधी यांचे समक्ष सिलबंद करुन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ही मतदान यंत्रे मतदानाच्या अगोदरच्या दिवशी १९ नोव्हेंबर रोजी उमेदवार व प्रतिनिधी यांचे उपस्थितीत सुरक्षा कक्ष उघडून मतदान केंद्राकडे पाठविण्याची तयार करण्यात येणार आहे. ८५ वर्षापेक्षा अधिक वयस्क मतदार व दिव्यांग मतदार यांचे विशेष गृहभेटीतून पोस्टल मतपत्रिका मतदान घेण्यात येणार आहे.१३२ नियुक्त गृहभेट मतदान पथकातून ३५९१ पात्र मतदार मतदान करतील तसेच उमेदवारांनी निवडणूकीत होणारा खर्च विहित नमुन्यात भरुन खर्च संनियंत्रण कक्षाकडे सादर करावा,असेही त्यांनी सांगितले.
More Stories
बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात,आमदारानी दिला शेतकऱ्यांना आधार
दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पृथ्वीराज चिलवंत यांचा वाढदिवस साजरा