भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे.हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो.या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. त्या दिवशी बहिणीने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जसे की लाडू, करंजी,गुलाबजाम,चकली, चिवडा हे सर्व दिवाळीसाठी केलेच असतात. त्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गेल्यानंतर संध्याकाळी एका पाटावर बसवून दिवा, हळद-कुंकू, अक्षीद यांनी सजवलेले ताट घेऊन आधी चंद्राला आणि नंतर आपल्या भावाला ओवाळते आणि दहीभाताचा नैवेद्य चंद्राला दाखविला जातो. भाऊ मग आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणीचे ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. काही ठिकाणी चित्रगुप्ताची पूजा या दिवशी केली जाते. बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस अशी ‘भाऊबीजे’ची ओळख आहे. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव आणि दीर्घायुषी राहावा हा यामागचा उद्देश असतो. आपल्या भावाला गोड पदार्थांचे जेवण वाढते. अशा प्रकारे हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव असतो. भाऊबीजेचा हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उत्तर भारतात, नेपाळमध्ये भाईदूज आणि भाई टीका असेही म्हणतात. हा सण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा दिवस आहे. आपल्या मनातील द्वेष निघून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते. म्हणून भाऊबीज साजरी करतात असेही म्हणतात. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. आपल्या शास्त्रात असंही सांगितलं जातं की स्त्रियांमध्ये या दिवशी देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने, तिच्या हाताने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओवाळून घेतल्याने भावाला व्यवहारिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. तसेच एखाद्या कोणत्या कारणामुळे बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही, तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते.सख्खी बहीण नसली तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हे आपल्याला महत्त्व दिसून येते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची. भाऊबीजेच्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांच्यासाठी भाऊबीजेचा कार्यक्रम केला जातो. कुष्ठरुग्णांबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत म्हणून त्यांच्यासोबत भाऊबीज केली जाते. देवदासींना भगिनींना भेटवस्तू दिल्या जातात. सणवारात सामाजिक उपक्रम करून त्याचा आनंद द्विगुणीत करण्याचा हा प्रयत्न असतो. सध्या कालानुरूप आणखी एक बदल पहायला मिळतो तो म्हणजे एक बहिणीच्या घरी किंवा एका भावाच्या घरी सगळेजण एकत्र जमतात आणि भाऊबीज साजरी करतात.
More Stories
पर्यावरण दिनानिमित्त माफसूच्या संचालनालय विस्तार शिक्षण येथे वृक्षारोपण
शाश्वत पशुपालनासाठी कुरण विकास व्यवस्थापन महत्वाचे – डॉ. नितीन पाटील, कुलगुरु माफसू
मानवी कल्याणासाठी युध्द नाकारणारा – सम्राट अशोक !