August 9, 2025

जिल्हास्तरीय संसर्गजन्य प्रतिबंध समिती गठीत

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.त्यामुळे जलजन्य व किटकजन्य आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला राज्य शासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात किटकजन्य,जलजन्य व प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.समितीची बैठक ५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांचे अध्‍यक्षतेखाली झाली.
    या बैठकीत जिल्ह्यातील साथरोग परिस्थितीचे विश्लेषण करुन साथरोग उदभवण्यानी कारणमीमांसा तसेच करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनांची रूपरेषा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील सध्याच्या साथरोग नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करुन त्यात आवश्यक बदल सुचविणे,जिल्ह्याच्या शेजारील जिल्हयामधील साथरोग परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करुन त्याअनुषंगाने आंतरजिल्हा समन्वयाचे मुद्दे निश्चित करणे,राज्य आणि केंद्रीय स्तरावरील मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, साथरोग निवारणासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवणे याबाबत संबधितांना सूचना देण्यात आल्या.
    यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल.हरिदास यांनी जिल्ह्यातील जलजन्य व कीटकजन्य आजाराबाबत माहिती समितीस दिली.उमरगा शहरातील संशयित डेंग्यू रुग्ण मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने या भागात साथ उद्रेक घोषित करून जलद ताप सर्वेक्षण,धूर फवारणी,आरोग्य शिक्षण ईत्यादी उपाययोजना करण्यात आल्या.याबाबत व सदर भाग व उमरगा शहरातून पाठविण्यात आलेल्या २१ रक्तजल नमुन्यापैकी २० नमूने निगेटिव्ह व ०१ डेंगू पॉझीटिव्ह आले.याबाबत माहिती दिली.
    जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्व तालूकास्तरावर संबधित तहसीलदार,गटविकास अधिकारी,नगर पालिका मुख्याधिकारी,वैद्यकीय अधीक्षक , तालूका आरोग्य अधिकारी, आय.एम.ए.प्रतिनिधी व जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी यांच्या 5 व 6 सप्टेंबर रोजी समन्वय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत तसेच प्रत्येक महिन्यात बैठक घेण्यात येत आहेत.
    नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक स्वछता राखणे,ताप येताच वैद्यकीय सल्ला घेणे,मच्छरदाणीचा वापर करणे,कोणताही ताप अंगावर काढू नये,स्वच्छ व शुद्ध पाणी पिणे, घरामध्ये व परिसरात साचलेले पाणी वाहते करणे व साथरोगापासून स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.
error: Content is protected !!