June 25, 2025

हासेगावं (शि.) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

  • हासेगाव (शि) – दि.15/06/2024 रोजी ठिकाण हासेगाव (शि.) येथे श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था, हासेगाव (शि.) ता.कळंब आयोजित ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति गाव 100 वृक्षाप्रमाणे परिसरातील 50 गावात 5000 वृक्षांचे वितरणांचा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करून विद्येची देवता माता सरस्वती देवींच्या प्रतिमेचे पूजन करत दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गुरुवर्य ह.भ.प प्रकाशजी बोधले महाराज (अखिल भारतीय वारकरी मंडळ – राष्ट्रीय अध्यक्ष) तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ.सरोजनीताई संतोष राऊत तसेच हासेगावं (शि.) गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. प्रयाली ताई गवळी, स्फूर्ती फाउंडेशन चे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
    श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या कार्यक्रमात 10 वी 12 वी चे गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक पात्र विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, फोल्डर फाईल व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संदर्भात संबोधन केले. नैसर्गिक परीचक्रात मानवी जीवनातील वृक्षांचे महत्व सांगत वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
    विद्यार्थ्यांना आपला शालेय जीवनाचा प्रवास व ध्येपूर्तीसाठी घेतलेला ध्यास विद्यार्थ्यांना सांगितला, तसेच जास्त गुण मिळाले म्हणून हुरळून जाऊ नये तर कमी गुण प्राप्त झाले म्हणून अपयश समजू नये, आपल्या ध्येयाच्या दिशेने एकलव्यासारखी नजर व गरुडासारखी झेप असावी, आणि परिस्थितीशी दोन हात करून आपल्याला अपेक्षेने शिकवणाऱ्या आई – वडिलांच्या मेहनतीची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले.
    कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून असेलेले गुरुवर्य ह.भ.प.प्रकाशजी बोधले महाराज (अखिल भारतीय वारकरी मंडळ – राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी आपल्या सांप्रदायिक विचारातून विद्यार्थ्यांना विनोदात्मक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ज्ञानाने तृप्त झाले पाहिजे, यशाचे शिखर गाठण्यासाठी पालकांची विद्यार्थ्यांप्रति असलेली धडपडीची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवण्याचे आवाहन महाराजांनी केले.
    श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था, हासेगाव (शि.) च्या अध्यक्षा डॉ. सौ. सरोजनीताई राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनत जीवावर विशेष प्राविण्य मिळाल्याचे सांगितले, विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान होणे ही पालकांचा अभिमान असून पालकांनी विद्यार्थ्यांप्रति ठेवलेला विश्वास आज साध्य झाल्याचे सांगितले, विद्यार्थ्यांनी ध्येयाकडे वाटचाल करताना जिद्द, – चिकाटीच्या बळावर उंच भरारी घेऊन आपले भविष्य सार्थकी लावावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले.तर संस्थेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून आपली संस्था विविध कार्यातून वाटचाल करत आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक व निराधार नागरिकांच्या पगारी अशा विविध उपक्रमांतून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कामाचा थोडक्यात आढावा डॉ. सरोजनीताई यांनी सांगितले. यापुढेही श्रीलक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी व समाज हिताचे कार्यक्रम व उपक्रम राबविले जाणार असल्याचे सरोजनीताईंनी सांगितले आहेत.
  • यावेळी कु. सिद्धी सचिन शिंगणापुरे श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव च्या विद्यार्थींनीने 100% गुण मिळवले,तसेच कु. अलसभा रईस रामपुरे विद्याभवन हायस्कूल कळंब 100%गुण मिळवले असल्याने यांचा विशेष सन्मान झाला असून 10 वी आणि 12 वी तील गुणवंत तसेच शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थ्यांचा फेटा बांधून, सन्मान चिन्ह, फोल्डर फाईल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
    गुणगौरव सन्मान सोहळ्यासाठी जनता विद्यालय हासेगाव, जि. प. शाळा हासेगाव, अटलबिहारी वाजपेयी जि.प.शाळा शिराढोण, सावित्रीबाई फुले हायस्कूल शिराढोण, के.एन. मराठी हायस्कूल शिराढोण, के.एन. उर्दु हायस्कूल शिराढोण, के. एन.ज्युनिअर कॉलेज शिराढोण, राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आवाड शिरपुरा, हनुमान विद्यालय घारगांव, संत गोरोबा काका विद्यालय सौंदणा आंबा, विद्या विकास हायस्कूल निपाणी, स्वामी विवेकानंद विद्यालयात पाडोळी, ज्ञानयोग विद्यालय कोथळा, छत्रपती संभाजी विद्यालय जवळा (खु.), गजानन विद्यालय देवधानोरा,
    जय भवानी विद्यालय गौरगांव, विद्याभवन हायस्कूल कळंब आदी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योतीराम सोनके तसेच कार्यक्रमाचे आभार सुरेश महाजन यांनी मानले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याकरीता नितिन पाटील, विकास राऊत, नाना पाटील, पवन म्हेत्रे, अरुण चौधरी, सोमनाथ टिंगरे, अशोक कानडे सर, भैरवनाथ पवार, सचिन गवळी, आदी जण उपस्थित होते.
error: Content is protected !!