August 9, 2025

भारत पशुधन प्रणालीवर नोंद घेणे बंधनकारक .

धाराशिव (जिमाका) – केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.राज्यातील सर्व पशुधनास इयर टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे 1 जून 2024 पासून बंधनकारक केले आहे.

या प्रणालीमध्ये पशुधनास करण्यात आलेल्या इयर टॅगिंग बारा अंकी कोड व बारकोड ची नोंद घेण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार,वंध्यत्व,उपचार व पशुपालकास नोंद हस्तांतरण या सुविधांचा समावेश आहे.या प्रणालीद्वारे पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या पशुधनाची कोणाच्या नावे नोंद आहे,प्रजनन,आरोग्य,जन्म – मृत्यू इत्यादी माहिती उपलब्ध होते. सर्व पशुधनाच्या कानात बिल्ला( टॅग) लावून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीमध्ये करणे अत्यावश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थेमार्फत पशुधनाच्या कानास बिल्ला लावून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याची प्रक्रिया पशुवैद्यकीय संस्थांकडे सुरू आहे. जिल्हाधिकारी यांना पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार दिले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुधनाची इयर टॅगिंग करून नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे.

सर्व ग्रामपंचायती नगरपंचायत/ नगरपालिका यांनी 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था/दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देता येणार नाही. तसेच अधिनस्त कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय पशुधनाची कत्तल करण्यास परवानगी देता येणार नाही.सर्व महसूल/वन/वीज महावितरण विभाग यांनी नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देता येणार नाही.कोणत्याही पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.परराज्यातून येणाऱ्या पशुधनास इयर टॅगिंग केल्याची व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खातरजमा तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी हे करणार आहे.पशुधनास इयर टॅग केलेले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांनी या पशुधनास इयर टॅगिंग करून नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करावी लागणार आहे.

1 एप्रिल 2024 नंतर बाहेरच्या राज्यातून राज्यात पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंगशिवाय करता येणार नाही. 1 जून 2024 पासून तसेच सर्व ग्रामपंचायत/महसूल विभाग इयर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समिती,आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री व बैलगाडा शर्यती करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.त्यामुळे इयर टॅगिंग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.त्याची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीला घ्यावयाची आहे. तसेच सर्व ग्रामपंचायत/ महसूल विभाग यांनी इयर टॅगिंग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये.

पशुधनाच्या मालकी हस्तांतरणा बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्यावत करून घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकाची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा हस्तांतरणाचा/परिवर्तनाचा दाखला पशुधनाची इयर टॅगिंग असल्याशिवाय/ झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. तसेच दाखल्यावर इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देखील देण्यात येऊ नये. दाखल्यावर इयर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये.दाखल्यावर इयर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात यावा.पशुसंवर्धन विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यातील पोलीस, वन,महसूल विभाग,स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका/ नगरपंचायत/ ग्रामपंचायत,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व त्या अनुषंगिक संबंधित प्रशासकीय विभागांना काटेकोरपणे करावी लागणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व पशुधन पालकांनी याची नोंद घेऊन आपल्या सर्व पशुधनांचे इयर टॅगिंग करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे

error: Content is protected !!