March 26, 2026

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक – सतिश टोणगे

  • कळंब – सध्या तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली असुन यांना आज महापुरुषांच्या विचारांची व आचरणाची आवश्यकता असल्याचे मत माजी नगरसेवक सतीश टोणगे यांनी व्यक्त केले.
    ते तालुक्यातील हसेगाव (के) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर पालकर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना टोणगे म्हणाले की सध्याची पिढी ही संस्कार, विचार व आचरणात दिशाहीन होत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान एक दिवस महापुरुषांचे चरित्र वाचन व त्यांचा संघर्ष वाचायलाच लावला पाहिजे तर त्यांचे त्याग या पिढीला समजेल व निश्चितच पुढच्या पिढीला सकारात्मक दिशा मिळाल्याशिवाय रहाणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    यावेळी शाळेतील अमोल सुर्यवंशी,प्रियंका वाघमारे,प्राची चंदनशिवे, आदित्य कुरूंद, रोहीनी कोल्हे, राजश्री कोल्हे, उज्ज्वला लंगडे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले तर सुत्रसंचालन अमृता कोल्हे व आभार बाबासाहेब दराडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हे दत्तात्रय, हजारे आदित्य, कोरे संतोष यांनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!