March 27, 2026

ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी

  • धाराशिव (जिमाका) – डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यकांमार्फत ३१ मार्च २०२६ पूर्वी ई-पीक पाहणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ई-पीक पाहणी नोंदणी सध्या सुरू आहे.या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत,कर्जसुविधा व विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
    रब्बी हंगामाची सुरुवात १० डिसेंबर २०२५ पासून झाली असून,शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी २४ जानेवारी २०२६ पर्यंत करण्यात आली होती.त्यानंतर सहाय्यक स्तरावरून २५ जानेवारी २०२६ पासून ई-पीक पाहणी नोंदणी सुरू करण्यात आली.या नोंदणीसाठीची मुदत पूर्वी १० मार्च २०२६ पर्यंत होती.मात्र,जिल्ह्यातील एकूण अपेक्षित क्षेत्रापैकी केवळ २४.६६ टक्के नोंदणी पूर्ण झाल्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत.यामुळे कोणताही शेतकरी शासकीय लाभांपासून वंचित राहू नये,यासाठी शासनाने ई-पीक पाहणी नोंदणीची अंतिम मुदत दि.३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविली आहे.
    ई-पीक पाहणीच्या नोंदीवरच पीक विमा योजना,नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई,शेतकरी कर्ज व अनुदान व इतर कृषी योजनांचा लाभ निश्चित होतो.म्हणून ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी अद्याप झालेली नाही,त्यांनी आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकांच्या मदतीने DCS मोबाईल ॲपच्या माध्यमातून ३१ मार्च २०२६ पूर्वी अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
    जिल्हा प्रशासनामार्फत गावोगावी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या कामाचा दररोज आढावा घेतला जात आहे.शासनाची ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून, भविष्यातील सर्व शासकीय लाभ ई-पीक पाहणीच्या नोंदीवर आधारित राहणार आहेत.
    तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सहाय्यकांच्या मदतीने आपली ई-पीक पाहणी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!