मराठवाडा मुक्तीसंग्रामात उपळा (मा.) गावचे विशेष योगदान
धाराशिव (जिमाका) –मराठवाडा मुक्ती संग्रामात धाराशिव जिल्ह्यामध्ये उपळा (मा.) गावचे विशेष योगदान आहे.या गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग घेतला.त्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनी अभिवादन करतो,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.उपळा गावातील तरूणांच्या मागणीनुसार स्मृती स्तंभाजवळ लवकरच स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्यात येईल,अशी ग्वाही देत जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्री सरनाईक यांनी केल्या. धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय ग्रामसभा शुभारंभ कार्यक्रम पार पडला.यावेळी पालकमंत्री सरनाईक बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपळ्याचे सरपंच सुहास घोगरे, उपसरपंच विकास पडवळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार,आदींसह सर्व ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले,संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम २०३० जाहीर केलेला आहे.सर्वांना सोबत घेऊन चला हा या कार्यक्रमाचा गाभा आहे.संयुक्त राष्ट्र संघाने १७ शाश्वत ध्येय व त्या अंतर्गत १६९ कलमे यानुसार लक्षीय उद्दीष्टे जाहीर केलेले आहेत. २०१६ पासून आपल्या देशात याची अंमलबजावणी सुरू आहे.देशाच्या पंचायतराज विभागाकडून ग्रामविकासासाठी शासनाचे विविध विभाग कार्य करत आहेत.त्यातूनच गावचा विकास करण्यावर शासन अधिक भर देत आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते किणगाव (जि. छत्रपती संभाजी नगर) येथून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ झाला,याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आदींचे याप्रसंगी मी अभिनंदन करतो,असेही पालकमंत्री सरनाईक म्हणाले. अभियाना अंतर्गत गावचा विकास करण्यावर शासनाचा अधिकभर असणार आहे.अभियानांतर्गत सुशासन पंचायत,गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण,लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे,जल समृद्ध,स्वच्छ व हरित गाव,मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण,सक्षम पंचायत, उपजीविका विकास,सामाजिक न्याय ही अभियानाची मुख्य घटक असून यातून सशक्त पंचायत आणि समृद्ध महाराष्ट्र घडण्यास मदत होणार असल्याचेही पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. सुरूवातीला गावातील स्मृती स्तंभ येथे पालकमंत्री सरनाईक यांनी पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांना वंदन केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.पालकमंत्री सरनाईक यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी स्वागत केले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान