धाराशिव (जिमाका) – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन कुटुंबांसाठी शासनाकडून चालविण्यात येणारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही २००४-०५ पासून प्रभावी असून,या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर ४ एकर कोरडवाहू अथवा २ एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येते. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील गावांमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाने जमीन विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत.जमीन विक्रीस इच्छुकांनी शासनाने ठरविलेल्या दरानुसार प्रस्तावासह आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असे कळविले आहे. प्रस्तावासोबत सादर करावयाची महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.अर्जाचा विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ उतारा व बोजामुक्तीचे प्रमाणपत्र,कृषी सेवा संस्थेचे व बँकेचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र,मोजणी नकाशा व अहवाल,न्यायालयीन वाद नसल्याचे शपथपत्र तसेच कुटुंबातील दोन सदस्यांच्या ना-हरकत प्रमाणपत्रासह स्वाक्षऱ्या. योजना अंमलबजावणीसाठी जिल्हा समिती प्रस्ताव विचाराधीन ठेवेल,मात्र ती जमीन खरेदी करणे बंधनकारक नाही.तरीही इच्छुकांनी प्रस्ताव सादर करताना सर्व अटी व शर्तींचे पालन करावे,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी