कळंब (शिवराज पौळ) – भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती, आणि या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणजे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या बौद्धिक प्रतिभेने, सामाजिक दृष्टिकोनाने आणि न्याय्य विचारसरणीने भारताला एक सशक्त,समतोल आणि प्रगत संपूर्ण जगाला आदर्शवत संविधान दिले. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते.त्यांनी विविध जाती,धर्म,भाषा आणि संस्कृतींनी भरलेल्या भारतासाठी एक सर्वसमावेशक संविधान तयार करण्याचे कठीण काम अत्यंत कुशलतेने पार पाडले. त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्क,दिशादर्शक तत्त्वे, लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्थेचा स्पष्ट आराखडा दिला,ज्यामुळे भारत एक स्वतंत्र, सार्वभौम,धर्मनिरपेक्ष व लोकशाही राष्ट्र बनू शकले.असे प्रतिपादन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्कूलमधील उपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांनी केले.
धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.२३ एप्रिल २०२५ रोजी प्रा.श्रीकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली “संविधान अमृत महोत्सवा”त हर घर संविधान भारताचे संविधान कार्यक्रमात सोपान पवार यांनी विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांबाबत मार्गदर्शन करताना महत्त्वपूर्ण विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की,”भारतीय संविधान हे केवळ एक कायद्याचे दस्तऐवज नसून,ते आपल्या राष्ट्राची आत्मा आहे.त्यामध्ये समाविष्ट असलेल्या मूलभूत हक्कांमुळे आणि कर्तव्यांमुळे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून घडू शकतो.”तसेच संविधानातील समानता,बंधुता, स्वातंत्र्य,धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्व पटवून दिला.त्यांनी नमूद केले की,”विद्यार्थ्यांनी संविधानाचे केवळ वाचन न करता त्यातील मूल्ये आचरणात आणली पाहिजेत.त्यामुळेच आपण एक सशक्त,नैतिक व देशाभिमानी पिढी घडवू शकतो.” त्यांनी असेही आवाहन केले की शाळांमध्ये केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता,संविधानाचे मूल्य विद्यार्थ्यांच्या वर्तनातून प्रकट व्हावे,यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत.विद्यार्थ्यांनी देशप्रेम,सामाजिक समता, सहिष्णुता आणि जबाबदारीची जाणीव मनात बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश घोडके प्रास्ताविक निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी केले तर आभार निदेशक राजकुमार शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास निदेशक कोमल मगर,निदेशक अर्जुन मंडाळे,दिक्षा गायकवाड व सर्व प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांचे उपस्थिती होती.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे