सेवेची 34 वर्ष 31 मार्च 2025 या दिवशी माझे मिस्टर श्री. विजय श्रीधरराव टोणगे हे लघुलेखक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत त्यासंबंधी हा लेख प्रपंच. जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव या येथुन तब्बल 34 वर्षे सेवा देऊन ते आज निवृत्त होत आहेत. त्यांचा जन्म 22 मार्च 1967 या दिवशी लातूर येथे झाला.दहावी पर्यंत कळंब येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर ते श्रुत लेखनाचे ( लघूलेखन) प्रशिक्षण घेण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातुर येथे गेले.तेथे त्यांनी मराठी लघुलेखनाचे व मराठी, इंग्रजी या विषयीचे टंकलेखकाचे कौशल्य प्राप्त करून पुन्हा पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी कळंब येथे प्रवेश घेतला.तेथुन त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्याकाळी म्हणजे सन १९८४-८५ साली लघुलेखन या विषयीची माहिती कळंब सारख्या ग्रामीण भागातील युवकांना व्हावी या हेतूने त्यांनी त्या विषयीचे क्लास घेतले. त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना त्यांची केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्र,उस्मानाबाद येथे आकांऊटंट या पदासाठी निवड झाली.कळंब येथुन नोकरी निमित्त ते उस्मानाबाद येथे वास्तव्यास गेले. तेथे त्यांना न्यायालयीन सेवेत असलेले कै.मोहन कोलांगडे,श्री. अनिल घुले,श्री.नारायणजी लोकरे,श्री.शहाजी काळे इत्यादी कळंब मधीलच वर्ग मित्र भेटले. त्यांच्या सहवासाने त्यांचे मन न्यायालयीन सेवेत आकर्षीत होऊ लागले.त्याचा परिणाम असा झाला की,त्यांनी नेहरू युवा केंद्रातील नोकरीचा राजीनामा देऊन १० जुन १९९१ साली न्यायालयात कनिष्ठ लिपिक या पदावर निवड होऊन नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सुंदर नोकरी नावलौकिकासह केली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. विशेष म्हणजे सन १९९१ साली नोकरीत असताना त्यांना कनिष्ठ लिपिक या पदावर त्यांनी दिवाणी व फौजदारी विभागात काम केले.परंतु ते विभाग त्यांना तितकेसे आवडले नसावेत,कारण त्यानंतर त्यांनी रोखे व वित्त विभागात काम स्वीकारले. वाणिज्य शाखेचे पदवीधर असल्यामुळे तसेच तेथे त्यांना सहाय्यक अधीक्षक हे अतिशय उत्तम मिळाल्याने श्री.विजय यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली व विषेश वेतनवाढीसाठी मा.प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांच्या कडे शिफारस केली. त्यामुळे साहेबांना कनिष्ठ लिपिक या पदावर विशेष वेतनवाढ देऊन गौरविण्यात आले. दरम्यानच्या काळात म्हणजे सन १९९२ साली आम्ही दोघे विवाह बंधनात अडकलो.मी एक शिक्षिका असल्याने माझी नोकरी व यांची नोकरी अशा धावपळीच्या जीवनाला सुरुवात झाली. न्यायालयात दर पाच वर्षांनी बदल्या होत असत.आपली बदली होऊन संसार विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. न्यायालयातील तत्कालीन वरीष्ठ हे अतिशय प्रेमळ व समजूतदार असल्याने त्यांना बरेच वेळा बदली पासुन मुदतवाढ दिली. आमचे कुटुंब त्यांचे नेहमीच ऋणी आहोत.
त्याकाळी मराठी भाषा ही न्यायालयात अतिशय कमी प्रमाणात वापरली जात होती. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या “मराठी लघूलेखन” चा उपयोग होणार नाही अशीच परिस्थिती झाली. परंतू मराठी भाषेचा दर्जा सुधारण्यासाठी व जास्तीत जास्त वापर करणे साठी,झालेला न्याय सामान्य माणसाला समजला पाहिजे अशा हेतूने शासनाने मराठी भाषा ही न्यायालयीन भाषा करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून शासनाने राज्यातील १० जिल्ह्यात प्रत्येकी तीन लघुलेखक प्रायोगिक तत्त्वावर नियुक्तीचे आदेश दिले. त्यामध्ये आपला जिल्हयाचा समावेश असल्याने सन २००६ मध्ये त्यांची मराठी लघुलेखक या पदावर नियुक्ती झाली. प्रामाणिकपणा,ज्ञान,कष्ट, प्रेरणादायक विचारांचा वाटाड्या, कायद्याचा धाक,आदर,सन्मान, कामाबाबत गोपनीयता त्यांच्याकडून शिकावे,असे अभ्यासू व्यक्तिमत्व होय. खरे तर आमचे मुळगाव हे पिंपळगाव (टोणगे) आहे. ते 1982 साली “धनेगाव डॅम” साठी संपादन झाल्याने आमच्या जमिनी ही त्यात गेल्या.आम्ही भूमिहीन झालो.एका भूमिहीन शेतकऱ्याच्या मुलाची कहाणी. एका धरणग्रस्त कुटुंबाची ही कहाणी.गावाचा ठावठिकाणा राहिला नाही.विस्थापित गाव, विस्थापित कुटुंब इत्यादी गोष्टींचा सामना करत आम्ही कळंबला स्थायिक झालो. आई अण्णांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा मंत्र दिल्यामुळेच आज आमचे कुटुंब या स्तरावर आले आहे.अण्णांच्या पुण्याईने आज आम्ही सन्मानित होत आहोत. आमच्या कुटुंबाविषयी सांगायचे झाले तर,हे तिघे जण भाऊ,ते तिघेही उच्च शिक्षीत व संस्कारीत.साहेब हे सर्वात थोरले.त्यांनी शासकीय नोकरीचा पर्याय निवडला.मधले भाऊसाहेब म्हणजे श्री.दिलीप हे बांधकाम क्षेत्रातील व्यवसायीक. आपल्या आवडीचा पर्याय निवडल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणुन नावलौकिक मिळवला आहे.तर सर्वात छोटे सतीश हे विज्ञान शाखेचे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेऊनही समाज कार्यात रस असणारे हे व्यक्तिमत्व.तसेच ते लोकप्रिय पत्रकार देखील आहेत. आमच्या कडे हिरो या दुचाकी कंपनीची एजन्सी देखील आहे. सर्व व्यावसायीक व्यवहार दिलीप व सतीश हे पाहतात. मला या ठिकाणी नमूद करावेसे वाटते की,तिघां भावामध्ये सामंजस्य असून वैचारिक मतभेद अजिबात नाहीत,तर असे हे आमचे कुटुंब.दिलीप व सतीश यांच्या सुविद्य पत्नी सौ.मनीषा आणि सौ.स्नेहा या गृहीणी आहेत. साहेबांबद्दल आणखीन लिहावयाचे झाल्यास त्यांनी आपल्या कर्तव्य काळात अतिशय प्रामाणिकपणे व पदाला शोभेल अशा तऱ्हेने कामाबद्दलची गोपनीयता बाळगली आहे.असे असताना देखील त्यांनी आपला वेगळा मित्र वर्ग तयार करून ते त्यात नेहमी रममान होतात. उदाहरण म्हणून मला त्यांच्या काही मित्रांचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो. माजी प्रबंधक श्री.तांबारे साहेब, श्री.लोकरे साहेब,श्री.घुले साहेब तसेच माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे माजी स्वीय सहाय्यक श्री.एफ.आर.काकडे, सध्याचे स्वीय सहाय्यक श्री. अशोक पवार,श्री.पी.एन.अघोर, श्री.आर.आर.शिंदे,श्री.बोरा साहेब,श्री.भाऊसाहेब मुंडे, प्रविण अपराध,श्री.भारती,श्री. अनिल बनसोडे,श्री.शफीक मुल्ला,श्री.शहाजी काळे, बालमित्रांमध्ये श्री.राजाभाऊ दीक्षित,श्री.सतीश खिंवसरा,श्री. दिलीप सुरवसे,असद खान, दिपक वेदपाठक,श्री.किशोर बियाणी,श्री.दीपक त्रिंबके, कळंब शहरातील कपड्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री. जयप्रकाशजी रुणवाल,श्री.प्रवीण बलदोटा इत्यादी होय.विशेष म्हणजे जे त्यांचे मित्र आज आपल्यात नाहीत ते कै.मोहन कोलांगडे,कै.प्रकाश बारगजे,कै.उमाकांत जाधव यांच्या नावाचा उल्लेख करणे अगत्याचे आहे. न्यायालयात माणूस हौसेने येत नाही कोणी न्याय मागण्यासाठी तर कोणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येतात.त्या सर्व सर्वसामान्य लोकांना ते सहकार्याची भावना ठेवून मदत करतात.न्यायालयीन कामात ते आनंदाने पूर्णवेळ सहयोग देतात.नवीन कर्मचारीवृंदाना सहकार्य करण्याची त्यांची नेहमीच भावना असते. साहेब हे शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वीकार करतात. पूर्णतः निर्व्यसनी जीवनाचा अंगीकार करतात.कोणीही कोणाच्या भांडणात पडू नये अथवा कलह निर्माण होऊ नये, याकरिता ते नेहमी प्रयत्नशील राहतात.ते खूप कुटुंबवत्सल व भावनिक हृदयाचे म्हणून समाजात त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य साध्या कुटुंबात जन्माला येऊन देखील माणुसकी कमावून माणुसकीसाठी विलीन होणे त्यांना पसंत आहे.त्यांची ही नोकरी प्रामाणिकपणाची एक पावतीच आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अनुभवाचे बोलतानाही अनुभव होऊन उंच हा चलाख असणाऱ्या दुनियेत निष्कपट राहून केलेली सेवा ही ईश्वराला प्रिय असते म्हणून मला माझ्या गझलेत असे लिहावेसे वाटते की – केला जीवनाने झगडा जरी देह चांदण्याने जिंकीला होता घेऊन पहाटेची प्राजक्त फुले नियतीने अपार धडे गिरविले तरी मी ईश्वराचा नकाशा काळजात कोरला होता हसले जगाचे रिकामे पहारेकरी फैसला ज्ञानाचा नाचला होता सारखा कष्टाचा चिखल तुडवत शुद्ध बीजाचा वसा वाटला होता वाटेतला धुराळा सुकण्यात वेळ गेला पाईच्या दगडाचा मारा कळसाला कोठे कळला ? लिहून ऐकते आवाज माझा मी संसार भिंतीत मिरवल्यासारखा संपली जरी नोकरी हे फार वेगळे आता पुढील जीवन असेल अमृताचे सोहळे
सोसण्यात जगण्याचा आवेश भिनतो आहे असंवातच जीव रक्ताचा मिसळला पाहिजे वेदना तू अन् मी गिळल्या आहेत त्या अनमोल भावावर आपला सूर्य तळपला पाहिजे रस्ता पाण्याखाली शोधला आहे जन्मभर चालून तू आता जिंकला पाहिजे नशिबाचे कण व्हावे रंगाहून एवढे माणसाचा रंगही त्यात वीरला पाहिजे प्रेम नुसते देत नाही वेग सामर्थ्याला कधी काळजाचा ठणकाही त्याच्यात जपला पाहिजे जय किंवा पराजय हे खरे नव्हे जो फितूर होईल त्याचा डाव विस्कटला पाहिजे हेच लिहिणे उद्या जाईल गगनावरी फक्त आता एकदा तारा चमकला पाहिजे. फक्त एकदा तारा चमकला पाहिजे.
— सौ.अलका विजय टोणगे सहशिक्षिका,कळंब. संपर्क – ९४२०७७०४८०
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे