August 9, 2025

व्हाईस मेसेज आणि एसएमएस प्रसारीत करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक

  • धाराशिव (माध्यम कक्ष) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या प्रचाराचा आता वेग वाढत आहे.विविध राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. उमेदवार मतदारापर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या आवाजातील ध्वनी संदेश (व्हाईस मेसेज) आणि लघु संदेश (एसएमएस) मतदारांच्या भ्रमणध्वनी पाठवू शकतात.परंतु हे संदेश मतदारांपर्यंत प्रसारीत करण्यापूर्वी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशीसह जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीची (एमसीएमसी) परवानगी घेणे आवश्यक आहे.यासंदर्भात कार्यरत असणाऱ्या एजन्सी तसेच उमेदवारांनी ही बाब लक्षात घ्यावी.
    विनापरवानगी इलेक्ट्रॉनिक्स फॉरमॅटमधील कोणत्याही प्रसिध्दी साधनाचा व प्रसिध्दी तंत्राचा वापर करण्यावर निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे.याचा फटका उमेदवाराच्या खर्चाच्या ताळमेळाला बसू शकतो.
    विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या खर्च सनियंत्रण विभागाकडून यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. उमेदवारांना प्रसिध्दीविषयक कोणतेही साहित्य वापरताना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) परवानगी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • *राजकीय पक्ष व उमेदवारांनी या बाबींची परवानगी घ्यावी*
  • राजकीय पक्ष व उमेदवारांनी दूरचित्रवाणी वाहिन्या,केबल नेटवर्क,केबल वृत्तवाहिन्या,सिनेमा हॉल,रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स,सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क लघु संदेश (बल्क एसएमएस),रेकॉर्ड केलेले ध्वनिफीत (व्हॉईस मेसेजेस),सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या सर्व जाहिरातीची परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • *वृत्तपत्र जाहिरातीसाठी शेवटचे दोन दिवस*
  • २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे माध्यम प्रमाणिकरण आणि माध्यम संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.यासाठी विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहे.जाहिरात प्रसारित होण्याच्या ४८ तास अगोदर राजकीय पक्ष,उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करावा.अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज ४८ तासात निकाली काढेल.
  • एमसीएमसी समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या २४ तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे.तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व पक्ष आणि उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.असे माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समितीने कळविले आहे.
error: Content is protected !!