कळंब – महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव (ज) आणि सातेफळ,सौंदना (ढो) या गावांना भेट देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सध्याच्या महायुती सरकारवर कडाडून टीका केली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. आमदार कैलास पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “राज्यातील शेतकरी आज संकटात आहे. सोयाबीन, कांदा, कापूस अशा पिकांचे दर मोठ्या प्रमाणात घटलेले आहेत, मात्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही. सोयाबीनचे दर घसरल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना योग्य ते संरक्षण मिळावे अशी अपेक्षा होती, परंतु सरकारने हमीभाव न दिल्यामुळे कमी भावात सोयाबीन खरेदी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे. सोयाबीन खरेदीच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.” याशिवाय,आमदार कैलास पाटील यांनी कांदा अनुदानाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. “कांदा अनुदान देताना सरकारने जाचक अटी लादल्या आहेत, ज्यामुळे अनेक शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. हे अनुदान मिळविण्याचे नियम इतके कठोर आहेत की, सामान्य शेतकऱ्याला त्याचा लाभ घेता येणे कठीण झाले आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
महायुती सरकारवर कडाडून टीका
आमदार कैलास पाटील यांनी महायुती सरकारला शेतकऱ्यांविषयीच्या धोरणांवरून धारेवर धरले. “हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त घोषणा करतं, प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कार्यवाही करत नाही. फक्त कागदावरच योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात शेतकरी त्रासातच आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मोठमोठ्या आश्वासनांनी फसवण्यात आले, मात्र आता त्यांच्याच समस्यांना महायुती सरकारने दुर्लक्षित केले आहे,” असे पाटील यांनी मतदारांसमोर ठासून सांगितले.
आ.पाटील यांनी मतदारांना आवाहन केले की, “सध्याच्या सरकारकडून फक्त घोषणांचा गाजावाजा होत आहे. विकासाच्या नावाखाली टिमकी वाजवली जात आहे, पण वास्तविक विकास होताना दिसत नाही. शेतकरी, बेरोजगार तरुण आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी या सरकारने काहीच ठोस काम केलेले नाही. त्यामुळे या वेळी निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करून खऱ्या विकासासाठी योगदान द्यावे.”
मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
आमदार कैलास पाटील यांच्या या दौऱ्यामुळे मतदारांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाटील यांनी उचललेले मुद्दे आणि त्यांच्याशी साधलेला संवाद मतदारांवर प्रभाव टाकणारा ठरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यामुळे मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, कैलास पाटील यांच्या उमेदवारीला अधिकाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील