August 9, 2025

तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • मुंबई – ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु करण्यात आली आहे.तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे.कोल्हापूर,जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून रवाना होत आहे.सर्व जिल्ह्यातून या योजनेसाठी नियोजन केले असून योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत.त्यामुळे तीर्थक्षेत्र दर्शनातून अध्यात्मिक व मानसिक समाधानाची पर्वणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हिडीओ संदेशामधून केले.
    मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे या जिल्हयातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी विशेष ट्रेन ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रवाना झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेन ला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या तीर्थयात्रेकरुंच्या प्रवासाला सुरूवात झाली.
    यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव,आय.आर.सी.टी.सी चे गौरव झा,सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे,सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार,सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे उपस्थित होते.
    मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत प्रभू श्रीरामाच भव्य अस मंदिर साकारलय.प्रभू रामाच दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळत आहे.याचे समाधान असून ही देखील एक भाग्याची गोष्ट आहे.पुढील काळात शेगाव,पंढरपूर बोधगया, दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणीही या तीर्थदर्शन यात्रेचा नियोजन केले जाणार आहे.ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यातून निवडलेला लाभार्थी हा भारतातील एकूण ७३ तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत.७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वृद्धावस्थेत उपयुक्त उपकरणे खरेदीसाठी ३ हजार रुपयांचे सहाय्य शासनाने दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
    मंत्री केसरकर यांच्या हस्ते गोपीचंद देसाई,चंद्रभागा वरेकर या यात्रेकरूंना प्रातिनिधिक स्वरूपात तिकीट देण्यात आले. मंत्री केसरकर यांनी रेल्वेच्या डब्यात जावून प्रवासी जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
    या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्हयातून 150,मुंबई उपनगर या जिल्हयातून 306 व ठाणे जिल्हयातून 471 अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्हयातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी आज रवाना झाले आहेत. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर,अजमेर,महाबोधी मंदीर गया,शेगाव,पंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातून 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू असल्याची माहिती मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, वंदना कोचुरे यांनी दिली.
    तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी पाणी,चहा,बिस्कीट,नाष्टा,जेवण ही व्यवस्था करण्यात आली आहे. ही रेल्वे इगतपुरी, भुसावळ,खंडवा,इटारसी, जबलपूर,सतना,वाराणसी मार्गे अयोध्येकडे जाणार आहे.यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक अशी टीम सोबत असणार आहे. यात्रेकरू अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम,लक्ष्मण,सीता,हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते,पारंपारिक नृत्य यावेळी सादर करण्यात आले.
error: Content is protected !!