June 20, 2025

हैद्राबाद मुक्ती लढ्याचे प्रेरणास्त्रोत;क्रांतिसिंह पं. गणपतरावजी कथले!

  • भारतीय स्वातंत्र्यापुर्वी हैद्राबाद संस्थानात निझामाचे राज्य होते. निझामाच्या अनन्वित अन्याय अत्याचाराने हिंदु रयत त्राहीभगवान झालेली होती. धार्मिक उन्मादाने करण्यात येणारी जुलूम जबरदस्ती, धर्मांतर बाटवाबाटवी, मंदिरे फोडणे, स्त्रियांमुलींचे अपहरण, दिवसाढवळ्या उघड्यावर गाई कापने इत्यादी त्रासाने घायकुतीला आलेली होती. यापासून वाचविणारा कोणीही तारणहार उरलेला नव्हता. नशिबाला बोल लावित हा उच्छाद निमूटपणे सहन करीत होती…… आणि….
  • झाला… उषःकाल झाला !
  • आणि एके दिवशी म्हणजे सन १९३२ला कळंब जिल्हा धाराशिव(उस्मानाबाद) येथे एका स्वातंत्र्य सुर्याचा उदय झाला. त्यांनी मराठवाड्यात कळंबमधे आर्यसमाजाची स्थापना केली.
    त्या वीराचे नांव होते, पं. गणपतरावजी कथले.
  • गणपतराव कथले यांनी हैद्राबादचे आर्यसमाजाचे नेते केशवराव कोरटकर वकील यांच्या कडून आर्य समाज तत्वज्ञानाचे बाळकडू घेतले होते. दीक्षा घेतली.
    कृण्वंतो विश्व आर्यम् चा नारा देऊन, हैद्राबाद संस्थानचे निझामाचे राज्य गेले पाहिजे, स्वराज्य आले पाहिजे, हे ध्येय निश्चित केले.
    आणि….. मग यासाठी काय करावे लागेल त्याची स्वनिर्मित रुपरेषा, योजना व पध्दती ठरविली. समाजाला स्वत्वाची जाणीव करुन देण्यासाठी, त्यांच्या मध्ये पौरुष पराक्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम तरुणांसाठी शाळा काढल्या. त्याठीकाणी शस्त्र चालविण्याचे शिक्षण,प्रशिक्षण सुरु केले.
    खंबीर मनाची व बलदंड ताकदीची, निर्भीड तरुणाई उभा केली. त्यासाठी तालीम, व्यायामशाळा काढल्या. एखाद्या अन्याय अत्याचारापुरता सिमीत लढा न ठेवता त्याला सातत्याने खतपाणी घालण्याची आवश्यकता असल्याने कळंबला सतत दोन वर्षे वातावरण निर्मिती, प्रबोधन करुन त्यांनी तरण्याबांड कार्यकर्त्यांची फौज उभा केली होती. आणि त्या बळावर आर्यसमाजाची जाहीर स्थापना केली.
  • हे असे कार्य मराठवाड्यात इतरत्र ही झाले होते, मग कथलेजींनी विशेष काय केले…… ?
    हैद्राबाद मुक्ती संग्रामातील अधिकृत स्वातंत्र्य सैनिक की ज्यांच्या नावे महाराष्ट्र शासनाने स्मारके, सुची फलक व हुतात्मा स्मारके उभा करुन ज्यांचा गौरव केलेला आहे. त्यापैकी ज्यांची नावे कोरलेली आहेत, लिहिलेली आहेत, आंदोलनातील त्या त्या प्रत्यक्ष लढलेल्या सैनिकांच्या मुलाखती कांही पत्रकारांनी वेळोवेळी घेऊन त्यांचे संकलन केलेले होते.
  • त्यावरुन कथलेजींच्या जीवनावर, कार्यावर व एकंदरीत आंदोलनावर प्रकाश पडतो. त्यानुसार सर्वांनी एकमुखाने प्रतिपादन केलेले दृग्गोचर होते, ते म्हणजे त्या त्या सैनिकांना हैद्राबाद मुक्ती संग्रामात भाग घेण्याची प्रेरणा पं. कथलेजी यांचीच होती.
  • कथलेजींनी महत्प्रयासाने हा यज्ञ उभा केला होता. महात्मा गांधींच्या आदेशावरुन हैद्राबाद स्टेट काँग्रेस मुक्ती आंदोलनातून बाहेर पडली.
    त्यामुळे हे आंदोलन पुढे प्रखरतेने व खंबीरपणे चालविले…. ते आर्य समाज संघटनेने.
    या आंदोलनात नंतर हिंदु महासभा, रामराज्य परिषद व अन्य कांही संघटना व पक्ष सहभागी झाले. आणि काँग्रेसचे सर्व सामान्य कार्यकर्ते आर्यसमाजाच्या नेतृत्वाखाली लढ्यात सामील झाले.
  • ठेविलें तुळशीपत्र घरावर !
  • आर्यसमाजचे कळंबचे नेते व माजी नगराध्यक्ष डॉ. डी.एल.मिटकरी यांचा पं.गणपतरावजी कथले यांच्याशी निकटचा संबंध होता. ते स्वतःला कथलेजींचे शिष्य म्हणून अभिमानाने सांगत असत.
    कथलेजीं बध्दल सांगताना ते म्हणाले की, हैद्राबाद रयत निजामाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी कथलेजींनी आपल्या स्वतःच्या घराची, संसाराची व इस्टेटीची राखरांगोळी करुन घेतली होती. स्वतःचा आडत व्यवसाय बंद करुन पुर्णवेळ आर्यसमाजा साठी वेचला. घरादारावर तुळशीपत्र ठेवले.
    आणि अहोरात्र पायात भिंगरी बांधून कळंब तालुक्यातच नव्हे तर पुर्ण जिल्हाभरात गलितगात्र, मुर्दाड झालेल्या हिंदु समाजात स्वत्वाचा, स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग चेतविला.
    गावोगावी तरुणांची सेना उभा केली. त्यांना तलवार, भाला बंदुकीचे शिक्षण प्रशिक्षण दिले. त्यासाठी गावोगावी शाळा काढून केंद्रे निर्माण केली. निझामाच्या, व रझाकाराच्या अन्याय अत्याचारास ठोशास ठोशा उत्तर देण्यासाठी सक्षम मने तयार केली. खून का बदला खून हे तत्त्वज्ञान लोकांत रुजविले. तरुणाई बरोबर महिलांच्याही लढावू फौजा उभा केल्या. महिलांसाठीही स्वतंत्र शाळा काढून त्यांना ही शस्त्रास्त्र शिक्षण दिले. एक प्रचंड चळवळ व आंदोलन उभारले.
    कथले हे कोणत्याही अन्यायाच्या विरोधात स्वतः धावत जाऊन सातत्याने अग्रेसर राहिले.
    हे सर्व कार्य करण्यासाठी आपली स्वतःची धनदौलत त्यांनी खर्चिली.
    परंतू जेंव्हा शस्त्र खरेदी शाळा खर्च याची व्याप्ती वाढली, तेंव्हा समाजातील धनीक वर्गाने कथलेजींचा त्याग, ध्येयवाद व प्रामाणिकपणाचे कार्य पाहून आपल्या धनदौलतीच्या पिशव्या कथलेजींच्या समोर आणून उपड्या केल्या. आणि तुमच्या कार्यात आम्ही सदैव सहभागी राहूत, असे वचन दिले.
    त्यामुळे केंव्हाही रात्री बारा वांजता कथलेजींची दोन बोटाची चिठ्ठी कोणाही सामान्य माणसाबरोबर आली तरी धनिक वर्ग अपेक्षेप्रमाणे रक्कम इच्छित स्थळी पोंहचती होत असे !
  • डॉ. मिटकरी यांनी सांगितले की, स्टेट काँग्रेस आंदोलनातून बाहेर पडली, मात्र आंदोलनानंतर त्यांच्याच सर्वत्र उदोउदो आणि गवगवा चालू ठेवला आहे. आणि ते आपल्याच टीरी बडवून घेण्याचे काम हेतूपुरस्सर चालू आहे.
    वस्तुतः सत्य इतिहास वेगळाच आहे. घराची राखरांगोळी करुन घेणाऱ्या वीरांचा इतिहास समाजासमोर येऊच दिला नाही. असो.
    तर कथलेजींच्या कळंबच्या कार्याची , पराक्रमाची चुणूक दाखवायची, सांगायची म्हटले तर…
    विस्तार भयास्तव कळंबची एकच घटना येथे मांडतो.
    अन्याय अत्याचाराच्या विरोधात कथलेजींचा प्रत्यक्ष सहभाग असायचा.
    एकदा कळंबमधे एका नवाबाने कळंब तालुक्यातील एका खेड्यातून एक सुंदर मुलगी अपहरण करुन उचलून आणून घरात डांबून ठेवल्याचे कथलेजींना गुप्तहेराकडून माहिती मिळाली. तेंव्हा कथलेजीं आर्य समाजभवन मधे होमहवन करीत होते. ही माहिती कथलेजींना कळाली असून ते कधीही आपल्या घरावर चालून येऊ शकतात, हे नवाबाला समजले. त्यामुळे त्यांने घरासमोर रझाकाराचा नंग्या तलवारीचा पहारा ठेवला होता. आणि जो भी सामने आयेगा उसे खत्म करादो, असा कडक हुकूम त्यांना जारी केला होता. इकडे होम पुर्ण झाल्यावर त्या मुलीला सोडवून आणण्याचा निर्णय व निर्धार कथलेजींनी जाहीर केला. आणि कथलेजी त्यांचे दोन अंगरक्षक सोबत घेऊन त्या नवाबाच्या महालाकडे निघाले.
    वाऱ्यासारखी बातमी गावभर पसरली. तालुकाभर पसरली.आणि….नवाबाकडेही पोंहचली. तिथे पहाऱ्यात खळबळ माजली.
    कारण स्वतः गणपतराव कथले हे इतके बलदंड पहिलवान व पराक्रमी होते की एकावेळी सहासहा माणसे जरी एकट्याच्या अंगावर आले तरीही कथलेजी भारी ठरत असत.
    तसेच त्यांचे दोन बाँडीगार्ड एक नारायण बोराडे व दुसरे जोतीबा शेळवणे ; हे ही कथलेजीं एव्हढेच शौर्यशाली होते.
    शेवटी दुपार टळून तिसऱ्या प्रहरी हे तिघे वीर त्या नवाबाच्या महालाजवळ पोंहचले ! नंग्या तलवारीच्या पहाऱ्यावरील पहिल्या रझाकारापर्यंत पोंहचले की कथलेजींनी बाँडीगार्ड मागे घेतले व स्वतः तलवार काढून पुढे झाले. रांगेमधे उभे असणारे रझाकार पहारेकरी कथलेजींना पहाताच गर्भगळीत झाले.
    आणि…… आणि वसुदेवासाठी यमुना दुभंगली तसा नंग्या तलवारीचा पहारा दुभंगला. मधोमध निर्माण झालेल्या वाटेने कथलेजी नवाबाच्या घरापर्यंत पोंहचले. बंद दारावर दस्तक देऊन कथलेजी म्हणाले, ” गोशेवाली औरते अपने बच्चोंको लेकर बाजू चले जाव. ” तशात घरातील बायका बाजूला झाल्या, दरवाजा खाडकन उघडला गेला.
    कथलेजी म्हणाले,”जोतिबा, बघ रे कुठाय ती पोरगी ?” जोतीने समोरच्या खोलीतून त्या अपह्रत मुलीला शोधले. आणि तिला घेऊन जोतीबा बाहेर येऊन म्हणाले , ” ही पोटुशी(गरोदर) आहे. “
    कथलेजी म्हणाले तिला खांद्यावर घे ! आणि ते तिघे आल्या पावली बाहेर पडले !
    पहारा जागच्याजागीच स्थितप्रज्ञासारखा उभा होता ! त्या मुलीला घेऊन कथलेजी समाजमंदीरात आले ! सगळ्या गावाने व तालुक्यातून आलेल्या लोकांनी हा पराक्रम प्रत्यक्ष उघड्या नेत्रांनी पाहिला, अनुभवला!
  • कथलेजीं असे महान होते श्रेष्ठ होते की त्यांचे पराक्रम पहाणारांच्या अन्तःकरणात विजिगिषा, सौदामिनीच्या प्रचंड वेगाने उफाळून खवळत असे !
    नंतर त्या मुलीला आर्यसमाजाच्या पध्दतीने शुध्द करुन घेऊन आपल्या स्वतःच्या घरी नेऊन तिची प्रसुती केली. तिला मुलगा झाला. त्यासही शुध्द करुन घेऊन आर्यसमाजाच्या पध्दतीप्रमाणे त्याचा सांभाळ केला. आणि मुलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले. म्हणजे प्रत्यक्ष सदाचारी वर्तनाचा धडा घालून दिला.
  • उक्ति व कृती या मधे फरक होऊ दिला नाही.
    बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले., असे आदर्श जीवन होते, कथलेजींचे।
  • कथलेजींच्या अशा वैविध्यपूर्ण कार्याने कळंब, व जिल्हाभरात एक हिंदुत्वाची, आर्यत्वाची क्रांती घडून आली. त्याचा परिणाम बीड जिल्ह्यापासून ते बीदर गुलबर्गा इथ पर्यंत झाला.
    कोणत्याही गावात पुर्वी निझामाचे अधिकारी, पोलीस व रझाकार आले की लोक गाव सोडून पळापळ करायचे, कथलेजींच्या क्रांती नंतर कोणी अधिकारी रझाकार आले की लोक चावडीवर जमा व्हायचे! महिलाही सशस्त्र यायच्या व आलेल्यांना जाब विचारायच्या !
    अधिकारी, पोलीस व रझाकार मस्तवालपणे बोलायचे, वागायचे !
    परंतू लोकांचे प्रत्युत्तर व एकंदरीत लढावू आवेश पाहून टरकायचे व काढता पाय घ्यायचे !
  • असेच झाले गौर मध्ये एका रझाकाराने एका महिलेची छेड काढली….. तेंव्हा तर महिलांनी व गावकऱ्यांनी त्याला मरेस्तोवर झोडपून काढले ! इतर तर पळूनच गेले.
    रक्तबंबाळ अवस्थेतील त्या रझाकारास गयावया करु लागला, माफी मागू लागला म्हणून गावाच्या बाहेर नेऊन निर्जन ठीकाणी फेकून दिले.
    निझाम व रझाकाराच्या जुलूमाला पायबंद बसला. इतका की रझाकारच भयग्रस्त झाले.
    त्यांच्या बेफाम हुंदडणाऱ्या वारुला कथलेजींनी वेसन घातली, लगाम घातला.
  • कथलेजींनी मुंबई इलाख्याच्या सरहद्दीवर आर्य सैनिकांचे कँम्पस् काढले. तेथून त्या त्या क्षेत्रावर लक्ष ठेवले जायचे. तेथून संरक्षण दिले जात असे. वेळप्रसंगी धावून यायचे. असा मोठा कँम्प मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजे बार्शी लगत इटला होता. संघटना मजबुती साठी व लोकांच्या संरक्षणासाठी या कँम्पस् चा मोठा उपयोग व्हायचा !
  • असेच एकदा दिल्लीहून आर्य समाजचे एक शिर्षस्थनेते संन्यासी महात्मा नारायण स्वामी हैद्राबादला आंदोलन करण्यासाठी जाणार होते. त्यांच्या वर निझामाची प्रवेश बंदी होती. तेंव्हा ते कथलेजींचे कार्य पहाण्यासाठी थोडी वाकडी वाट करुन बार्शीमार्गे कळंबला आले. कळंब मध्ये बंदी असूनही कथलेजींनी त्यांची मिरवणूक काढून भव्यदिव्य स्वागत केले. पोलीस यंत्रणा, प्रशासन मूग गिळून पहातच राहिले…..
    मात्र शेवटी पोलिसांनी आर्जवे केली की किमान मिरवणुकीत तुम्ही बँड लावू नका.
    कथलेजींनी कायदा न मोडता बँड वाजविलाच पण बेमालूमपणे !
    म्हणजे कळंबमधे निझामाचे नव्हे तर कथलेजींचे राज्य होते.
    नंतर नारायण स्वामीं म्हणाले ” यहाँ तक तो हम सुरक्षीत आ गये. लेकिन हमे हैद्राबाद जाना है ! वहाँ तो प्रवेश बंदी है ! ” तेंव्हा कथलेजींनी त्यांना हमरस्त्याने न नेता आडमार्गाने रेल्वे स्टेशन पर्यंत पोंहचविले.
  • हैद्राबाद मुक्ती आंदोलना संदर्भात दक्षिण भारतीय आर्य प्रतिनिधी सभेची एक बैठक कळंबला झाली होती. त्याबैठकीनंतर कथलेजींनी कळंब येथे एक मोठे आंदोलन केले होते !
    त्या आंदोलनाची व्याप्ती व परिणाम विशद करताना सांगण्यात येते की, गुजरात मध्ये बारडोली येथे सरदार वल्लभभाई पटेलांनी जे मोठे आंदोलन केले होते, त्या धर्तीचे हैद्राबाद मुक्ती लढ्यातील हे पहिले आंदोलन कळंबचे होते.
    म्हणजे मुक्ती लढ्याचे पहिले रणसिंग कथलेजींनी कळंबमधे फुंकले होते.
    ज्याचा परिणाम मराठवाडाभर झाला.
    महात्मा नारायण स्वामी हे आंदोलन पाहून म्हणाले होते की, ” हैद्राबाद मुक्ती संग्राम का कलम्ब यह ‘ हैद्राबाद की बारडोली ‘ है ! ”
    एव्हढेच नव्हे तर त्यांनी तसे लेखी अभिप्राय पत्र आर्यसमाज कळंबला दिलेले होते. ते पत्र कळंब आर्यसमाजाच्या कार्यालयात अजूनही आहे.
  • म्हणजे मुक्ती आंदोलनाचे रान तयार करुन ठेवण्यात कथलेजींचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचे योगदान महान होते, श्रेष्ठ होते.
  • या आंदोलनात महिलांचा सहभाग ही लक्षणीय होता. कथलेजींनी आर्य विरांगणा दल स्थापन केले होते. त्याच्या सेनापती कमलताई सिद्धलिंगप्पा मोदी या लढावू बाण्याच्या रणरागिणी होत्या.
    बालवयापासून त्यांना कथलेजींनी तलवार, भाला, बंदूक चालविण्याचे शिक्षण दिलेले होते.
    त्या परवापरवा पर्यंत हयात होत्या. २०२०ला त्यांचे निधन झाले.
    त्या कमलताई, हैद्राबाद मुक्ती आंदोलनात सक्रीय असल्याने याबाबत बोलताना म्हणाल्या होत्या की, ” पं.कथलेजी सांगत असत की हा लढा व ही जिद्द आपल्या जीवना नंतरही चालू रहायला हवी.
    हे एक कायमस्वरूपी आंदोलन झाले पाहिजे.
    आपले ध्येय फार मोठे आहे.
    कृण्वंतो विश्व आर्यम् हे महर्षी दयानंद स्वामींचे स्वप्न आपणास पुर्ण करावयाचे आहे.
    त्या करीता पिढ्यानपिढ्या हा संघर्ष यज्ञ चालू राहिला पाहिजे. “
  • सध्या आपल्या समोर आपले हैद्राबाद राज्य मुक्तीचे ध्येय आहे. अत्याचारी निझामाला नेस्तनाबूत करुन स्वातंत्र्य प्राप्त करायचे आहे.
    ” यासाठी कथलेजींनी कायम प्लँटफार्म म्हणून आर्यसमाजाचे स्वतः च्या मालकीचे स्वतंत्र भवन बांधले. तेथे दैनंदिन शाळेबरोबर तालुक्याचे, जिल्ह्याचे मुख्य केंद्र निर्माण केले. दर रविवारी तेथे होमहवन व यज्ञ सुरु केला.
    आर्यसमाजचा वार्षिक उत्सव सुरु केला. त्यामधे प्रबोधनासाठी देशपातळीवरील अगदी दिल्लीपर्यंत चे आर्य पंडीत व अभ्यासू वक्ते यांना आमंत्रित करण्यात येत असे. कळंब धाराशिवच्या आर्यसमाजाच्या कार्याने व हैद्राबाद मुक्ती आंदोलनाच्या कार्याने कथलेजींचे नावलौकीक राष्ट्रीय स्तरापर्यंत पोंहचले होते.
  • त्याच बरोबर कथलेजींनी आर्यसमाजाच्या जात्त्यूच्छेदक तत्वज्ञानाची चळवळ उभा करुन समाज एकजिनसी केला होता.
    त्यामुळे ब्राह्मणापासून ते मागासवर्गीय घटका पर्यंत सर्व जातीपाती मुक्ती आंदोलनात हिरीरीने अग्रेसर होत्या. ” आजची पुरुष महिलांची स्वातंत्र्य सैनिकांची यादी त्याचा ढळढळीत पुरावा आहे.
    महिला वर्गही त्या आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी होता.
  • आर्यसमाजच्या दक्षिण भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठका कळंबला होत असत. त्यावेळी प्र.सभेचे नेते मत व्यक्त करीत असत की, कथलेजींच्या प्रेरणेने मराठवाड्यात, हैद्राबाद संस्थानात आर्य चळवळ व मुक्ती लढा प्रचंड फोफावला.
    कित्येकांनी कथलेजींच्या कार्याने स्फुर्ती घेऊन मुक्ती लढ्यात आपले सर्वस्व झोकून दिलेले आहे, असे पराक्रमी शूरवीर कळंबला येऊन त्याकाळी स्वतः प्रतिपादन करीत होते.
    कथलेजींनी लावलेले हे रोपटे त्यांच्या मागे प्रचंड वटवृक्षात रुपांतरीत झालेले होते.
    त्यामुळे निझामाच्या अन्याय अत्याचारास मोठा पायबंद बसला होता.
  • शेवटी…..
    क्रांतिकार्यात एखादी व्यक्ती आपले बलिदान देऊन महान होतेच होते. आणि त्या क्रांतीला, लढ्याला व आंदोलनाला दणकट मनगटाची व विजिगिषू वृत्तीची, निर्भीड मनाची माणसे उभा करणे, त्यांच्या संघटना उभा करणे व त्या संघटना सातत्याने चालविणारी पिढी उभा करणे ; याकरीता दूरदृष्टीने जी दूरगामी क्रांती चेतविली जाते ते कार्य पं. गणपतरावजी कथले यांनी केलेले होते.
    म्हणून त्यांना क्रांतिसिंह म्हटले जाते !
  • त्यामुळे कथलेजींच्या निधनानंतर अंतयात्रेला दिल्लीहून आर्यनेते महात्मा नारायण स्वामी हे स्वतः कळंबला आलेले होते.
  • स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर कळंबला !
  • कथलेजींच्या आर्यसमाजाच्या कार्याची महती, त्यांचा पराक्रम, हिंदुसमाज बांधणीसाठी त्यांनी केलेले जात्त्यूच्छेदक चळवळीचे कौशल्यपुर्ण यशस्वी कार्य,त्यांचा टोकाचा त्याग व हैद्राबाद मुक्ती आंदोलनात कार्यकर्त्यांची प्रचंड फळी उभारण्याचे योगदान याबाबतचे कार्य स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांपर्यंत जाऊन पोंहचले होते.
    पं. कथलेजींच्या कार्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना कळंबला खेचून आणलेले होते.
    कथलेजींना समक्ष भेटण्यासाठी तात्याराव सावरकर मुद्दाम कळंबला आलेले होते. परंतू सामान्य आजाराचे कारण होऊन कथलेजींचे अकाली निधन झालेले होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
  • त्यामुळे त्यांनी मुक्ती आंदोलनात आर्यसमाज व हिंदु महासभा यांच्या एकत्रित उठावासाठी कळंबला बैठक घेतली होती.
    या बैठकीस धाराशिव प्रमाणेच बार्शी सोलापूरचे कार्यकर्ते सहभागी होते.
    ही बैठक आर्य विरांगणा दलाच्या सेनापती सौ. कमलताई मोदी यांच्या माडीवर घेण्यात आली होते. त्या बैठकीत मुक्ती लढ्याची रुपरेषा व नोंदणी सुद्धा करण्यात आली होती.
  • आर्यसमाजाच्या हैद्राबाद मुक्ती आंदोलनाच्या जबरदस्त रेट्यामुळे पुढे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेलांनी पोलीस अँक्शन करुन हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात समाविष्ट केले.
  • मात्र मुक्तिदाता म्हणून जनमानसात अजूनही कथलेजींची प्रतिमा ह्रदयात विराजमान आहे.
    .
    १९७५ साली, अटलबिहारी वाजपेयी हे जनता राजवटीत परराष्ट्रमंत्री असताना कळंबला आले होते. तेंव्हा त्यांनी अभिमानाने प्रतिपादन केले होते की,
    ” हमे यह कहते हुए गर्व होता है के, हम कथलेजींको गुरुस्थानी मानते है। ” …….
  • लेखक – राजेश नाना काटे पाटील, कळंबकर.
    मुक्त पत्रकार पुणे. 9403136731. nana.kate43@gmail.com
error: Content is protected !!