धाराशिव (जिमाका) – राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” कार्यान्वित करण्यात आली आहे.या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विविध क्षेत्रीय कार्यालयांना निदर्शनास आलेल्या अडचणी दूर करण्यासह योजनेचा व्यापक होण्याच्या दृष्टीने अतिरिक्त सूचना देण्यात आल्या आहेत.आता केंद्र शासनाकडे नोंदणी केलेले आस्थापनासाठीचे कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.या योजनेत खाजगी आस्थापनांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी खाजगी आस्थापनांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करताना EPF, ESIC,GST,DPIIT, Certificate of Incorporation, केंद्र शासनाचे उद्योग आधार यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. कोणतेही एक प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
योजनेंतर्गत उत्पादन (Manufacturing ) क्षेत्रातील खाजगी आस्थापना /उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा (Service) क्षेत्रातील खाजगी आस्थापना/उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या २० टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेता येणार आहेत.उद्योग आधार/उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांतील (MSME) आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेता येणार आहे.तसेच या योजनसाठी सुधारीत वाढीव उद्दीष्ट जिल्हयासाठी देण्यात आलेले आहे. जिल्हयात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी खालीलप्रमाणे संनियंत्रण अधिकारी नेमण्यात आले आहे.ग्रामीण भागासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तर शहरी भागासाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची संनियंत्रण अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आता सुयोग्य विमाछत्र प्रदान करण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/ निमशासकीय आस्थापना/उद्योग/महामंडळे/स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) यांना त्यांच्या मंजूर पदांच्या ५ टक्के इतके उमेदवार या योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेता येतील.तसेच,मंजूर पदसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शासकीय/ निमशासकीय आस्थापनांमध्ये व ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सहकार विभागाने निवड केलेल्या सक्षम प्राथमिक कृषि सहकारी सोसायटी (Primary Agriculture Cooperative Society-PACS ) कार्यालयात प्रत्येकी एक उमेदवार प्रस्तुत योजनेंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेता येणार आहे. या योजनेत सर्व आस्थापनांनी आणि रोजगारक्षम प्रशिक्षणार्थी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.
More Stories
अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन