March 26, 2026

आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी – संजय शिंत्रे

मुंबई (तात्यासाहेब सोनवणे ) – सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांचा वापर करतांना नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, अशा प्रकारची कोणतीही पोस्ट न करता दक्षता बाळगावी, असे आवाहन सायबर क्राईम विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि ही सर्व ‘माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. समाज माध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाही, यासाठी सायबर क्राईम विभागामार्फत काळजी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स इत्यादी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत विभागामार्फत कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची ऑनलाइन होणारी फसवणूक व गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभागामार्फत कशा प्रकारे दक्षता घेण्यात येत आहे, याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक शिंत्रे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत गुरूवार दि. ४, शुक्रवार दि. ५, शनिवार दि. ६ आणि सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

error: Content is protected !!