March 27, 2026

जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

  • नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन
  • क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या कामावर भर

  • धाराशिव (जिमाका)– महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासात्मक पालट होत असून,या उपक्रमात केवळ संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण कामाला अधिक महत्त्व आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
    महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांची संख्या जरी मोठी नसली तरी त्यांनी केलेले काम अत्यंत दर्जेदार आहे.महिला जिद्दीने व्यवसाय करून आर्थिक उलाढाल वाढवत आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महिलांना बचत गटात समाविष्ट करून एकही कुटुंब या चळवळीपासून वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी आज २७ मार्च रोजी केले.
    धाराशिव शहरातील शहर पोलीस स्टेशनजवळील उस्मानाबाद क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प’ अंतर्गत २७ ते २९ मार्च दरम्यान आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक साळुंके,प्रभारी महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महादेवी रणदिवे तसेच माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी नमूद केले की,महिला आर्थिक विकास महामंडळाने १९९४ साली स्थापन केलेले बचत गट आजही कार्यक्षमतेने कार्यरत आहेत,हे मोठे यश आहे.बचत गटातील महिला विविध प्रशिक्षण घेतात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची प्रगती साधत आहेत.त्यामुळे या बचत गटांमध्ये मोठी क्षमता असून माविमच्या बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी बाजारपेठेत (मार्केटिंगमध्ये) अधिक सक्रिय सहभाग घ्यावा,असे त्यांनी आवाहन केले.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी फीत कापून उद्घाटन करण्यात आले तसेच माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत,जीवामृत व दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी प्रत्येकी १४,८०० रुपये प्रमाणे ३५ महिलांना एकूण ५ लक्ष १८ हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.यामध्ये शारदा नेताजी देशमुख,प्रज्ञा संतोष खंडाळकर,महादेवी बालाजी कोराळे व शिल्पा बळीराम लादे यांना प्राथमिक स्वरूपात धनादेश देण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी केले.सूत्रसंचालन सीएमआरसीचे सहव्यवस्थापक किशोर टोम्पे यांनी केले,तर उपस्थितांचे आभार सीएमआरसी व्यवस्थापक महादेव पवार यांनी मानले.या कार्यक्रमास बचत गटातील महिला,अधिकारी,कर्मचारी तसेच सीएमआरसीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!