धाराशिव ( सतीश घोडेराव याज कडून )- धाराशिव शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि सांस्कृतिकदृष्ट्या गौरवशाली असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यानचा रस्ता आजही अरुंद आणि अपुऱ्या सुविधामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांनी या रस्त्याचे ३० मीटर पर्यंत तात्काळ रुंदीकरण करण्याची जोरदार मागणी करत, प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.अन्यथा बौद्ध समाज रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन छेडेल. आर.पी.आय. (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, “हा रस्ता केवळ वाहतूक मार्ग नसून, आमच्या श्रद्धेचा आणि सामाजिक अस्मितेचा प्रश्न आहे.” दरवर्षी या मार्गावर हजारो नागरिक,विशेषतः बौद्ध बांधव,महामानवांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात.मात्र,अरुंद रस्ता आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केवळ तात्पुरत्या उपाययोजना करत वेळ मारून नेली. कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे,नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रशासनाचा हा उपेक्षात्मक आणि बेफिकीर दृष्टिकोन निषेधास पात्र आहे. “जर लवकरात लवकर ३० मीटर रुंदीकरणास मंजुरी देण्यात आली नाही, तर बौद्ध समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल,”असा स्पष्ट इशारा राजाभाऊ राऊत यांनी दिला. त्यांनी पुढे म्हटले की, “हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी, प्रतिष्ठेशी आणि सामाजिक सन्मानाशी निगडीत आहे. यास हलक्यात घेणे धोक्याचे ठरेल.”असे निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदनावर आर.पी.आय.(खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,राज्य सचिव,राष्ट्रवादी काँग्रेस (SP) अल्पसंख्याक विभाग शरीफ शेख,राज्य अतिरिक्त महासचिव,कास्टट्राइब कर्मचारी संघटनचे हरिभाऊ बनसोडे,ज्येष्ठ नेते बाबासाहेब बनसोडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजयकुमार गायकवाड,धम्मपाल बनसोडे, बाबासाहेब माने, तालुकाध्यक्ष संपत्त सरवदे,(माजी संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना), सुग्रीव कांबळे,नागनाथ शिंदे यांच्या सह्या आहेत.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान